मुंबई : वास्तूरचनाकार आत्महत्या प्रकरणात अटक झालेल्या रिपब्लिक टीव्हीचे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. राजभवनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी चर्चा केली व अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी केली.", असे ट्विट राज्यपालांनी करत ही माहिती दिली आहे.
राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
रिपब्लिक टीव्ही’चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी यांची रवानगी रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानकपणे अलिबागहून तळोजा कारागृहात करण्यात आली. विशेष म्हणजे अर्णव यांना घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी वापरलेल्या वाहनाला यावेळी काळे पडदेही लावण्यात आले होते. अनेक वृत्तवाहिन्यांमार्फत दूरचित्रवाणीवर ही दृश्ये पाहिल्यानंतर जनआक्रोश विविध माध्यमांतून व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण देशभरातून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळोजा कारागृहाच्या परिसरातही सरकारी दडपशाहीचा निषेध करण्याकरिता आजुबाजूच्या सोसायटीतील नागरिक जमू लागले. अचानक मोटारसायकलवरून आलेल्या काही जाळीदार टोपी घातलेल्या लोकांचा शिरकाव झाला आणि त्यातून एकच गोंधळ उडाला. अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचे पडसाद चौथ्या दिवशी तळोजा कारागृहाबाहेर सकाळपासूनच पाहायला मिळाले. आजुबाजूच्या सोसायटीतील लोक खाली उतरले होते. काही जण दबक्या आवाजात तर काही जण उघडपणे सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करीत होते.