महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कुणी लावले ? : संजय राऊत
मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दावा केल्याने सध्या राज्य सरकारने केंद्रावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्राने जागेवर दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला.
कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले?, असा प्रश्न विचारत याला भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत हा प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, “महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र." राज्य सरकारच्या या सुडाच्या राजकारणामुळे मेट्रो धावण्यासाठी विलंब होत आहे, असा आरोप भाजपने केला आहे.