जम्मू : एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे आपले भारतीय लष्कर हे पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांशी लढा देत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन पुत्रांना गमावले. शानिवारीदेखील पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या एका चकमकीत महाराष्ट्राने आणखी एक पुत्र गमावला. ते म्हणजे कोल्हापूरमधील निगवे- खालसा गावचे ३७ वर्षीय संग्राम शिवाजी पाटील.
आज पहाटे काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी केलेल्या हल्ल्यात संग्राम पाटील यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठिमागे आई, वडील, भाऊ बहीण, पत्नी, दोन, मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.