सातारा : साताऱ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीची पुढील दिशा ठरविण्यासाठी विभागीय गोलमेज परिषद सोमवारपासून सुरु झाली आहे. यावेळी 'जर आपण सर्व एकत्र आलो नाहीत, तर दुसरे सामाजिक पानिपत व्हायची वेळ मराठा समाजावर येईल आणि इतिहास तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा माफ करणार नाही' असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
"मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. हा लढा तोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये. लोक नेहमी बोलतात, इतिहासात मराठा समाजाचे एकदा पानिपत झाले आहे. त्यामुळे आता जर आपण सर्वजण एकत्र आलो नाही, तर दुसरे सामाजिक पानिपत व्हायची वेळ मराठा समाजावर येईल आणि इतिहास तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा माफ करणार नाही," असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, " आमदार म्हणून अथवा राजा म्हणून मी येथे आलेलो नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलो आहे. मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहात त्यास माझा पाठींबा आहे." यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेशदादा पाटील, मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांच्यासह पाच जिल्ह्यातील मराठा मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
पुढे शिवेंद्रराजे म्हणाले की, "आम्हाला दूस-या समाजाचे आरक्षण काढून द्या, असे आम्ही म्हणत नसून आम्हांला आमचे द्या अशीच आपल्या सर्वांची मागणी आहे. तसेच, सर्व मराठा बांधवांना माझी व्यक्ती म्हणून विनंती आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढावा. हा लढा तोडण्याचा प्रयत्न कुणी करू नये. काही लोक एकत्र बसल्यावर नेहमी सांगतात." अशी खंत व्यक्त केली आहे.