मुंबई : ''राज्यातल्या वीज ग्राहकांना कोरोना काळातल्या वीज बिलांमध्ये सवलत देण्यास उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नकार दिल्याने भाजप आक्रमक झाला आहे. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला, अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल.'' असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.
उच्च व लघुदाब ग्राहकांची वीजबिलांची सुमारे सात हजार कोटींची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोना काळातील आलेली वाढीव बिलांबाबत सवलत देण्याची शक्यता मावळली आहे. थकबाकीदार ग्राहकांना टप्प्या टप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा राहणार आहे. पण तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने वसुली केली जाणार आहे. त्यासाठी विजवितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
वीजबिलाची वाढलेल्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात वीजबिलांचा भरणा वेळेत न झाल्याने अनेक ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. त्यावर वीज वितरणने वाढीव दराने बिले ग्राहकांना पाठविल्याने ग्राहकांत असंतोष निर्माण झाला होता. आता सरकारच्या नव्या निर्णयाने पुन्हा असंतोष पसरला आहे.