मंदिरं कशाला उघडली असे म्हणणार्यांना महाराष्ट्राचे नाव लावण्याचा अधिकार नाही. कारण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती तीही मंदिरामध्येच. महाराष्ट्र नव्हे तर देशाची संस्कृती आणि वैभवशाली आध्यात्मिक परंपरा टिकवून ठवेली तीही मंदिरांनीच. त्यामुळे यापूर्वी मंदिर बंदीचा घाट ज्यांनी घातला होता, त्यांना महाराष्ट्राची जनता तल्लीन आणि टल्ली होण्यातला फरक लक्षात आणून देईलच.
कोरोनाच्या नावाने मंदिरे बंद ठेवणार्यांना अचानक उपरती झाली आणि मंदिरे सोमवारपासून म्हणजे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उघडली जाणार आहेत. मागच्याच आठवड्यात ‘बेस्ट सीएम’ यांनी घोषणा केली होती की, मंदिरात लोक भक्तीने तल्लीन होतात आणि मग कोरोना पसरणार. अर्थात, तल्लीन होणे आणि टल्ली होणे यामध्ये फरक असतो, हे त्यांना कोण सांगणार. किंबहुना सांगायलाच हवे होते, नाही सांगायला हवेच होते. पण जाऊ दे गेल्याच आठवड्यात मंदिरं उघडणार नाही, म्हणणार्यांनी मंदिरं उघडायची परवानगी दिली. आता काही लोक म्हणतात की, भाविकांनी देव-देवतांना मानणार्या हिंदू समाजाने, संत-वारकर्यांनी, भरपूर आंदोलनं केल्यावर, विरोध केल्यावर ही देवळे उघडली गेली. नाहीतर महाराष्ट्र सरकारने तर मंदिरबंदीचा घाट कायमच ठेवला होता. असो, मंदिरं आणि प्रार्थना स्थळं उघडली. यावर काही व्यक्तींंचे म्हणणे असते की, देव सर्वत्रच आहे ना? जो देवळात असतो तोच घरा-दारात असेल ना? मग मंदिरातच देव का पुजायचे? कशाला हवी आहेत मंदिरं? (हे तेच लोक ज्यांना अयोध्येतल्या राम मंदिराने फेेफरे आले आहे.) यावर मला एका संतांचे म्हणणे आठवले, ते म्हणाले, “हवा सर्वत्र आहे, इथे तिथे सगळीकडे, मग सायकलमधली हवा गेली तर ती भरावी लागतेच ना? हवा तर सगळीकडे आहे, नको भरूया हवा. असे म्हणून सायकलमध्ये हवा भरली नाही तर सायकल चालेल का? ती हवा सायकलच्या त्या विशिष्ट ठिकाणी भरली तरच चालते. तसेच मानवी मनाच्या भावनांचे आहे. देव सगळीकडे असला तरी देवाची पूजा करण्याचे स्वतंत्र स्थान माणसाला वेगळी अनुभूती देऊन जाते.” मंदिरे कालही समाजाची प्रेरणा आणि शक्तिस्थाने होती आणि आजही आहेत. मंदिरं कशाला उघडली असे म्हणणार्यांना महाराष्ट्राचे नाव लावण्याचा अधिकार नाही. कारण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती तीही मंदिरामध्येच. महाराष्ट्र नव्हे तर देशाची संस्कृती आणि वैभवशाली आध्यात्मिक परंपरा टिकवून ठवेली तीही मंदिरांनीच. त्यामुळे यापूर्वी मंदिर बंदीचा घाट ज्यांनी घातला होता, त्यांना महाराष्ट्राची जनता तल्लीन आणि टल्ली होण्यातला फरक लक्षात आणून देईलच.
देश रामाचा, रावणाचा नाही!
रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. अर्थात, त्यांचे म्हणणे काय गंभीरपणे घ्यायचे असते का? असे लोकांचे म्हणणे असते. पण त्यांच्या या विधानावर मला देव-धर्माला न मानणार्या निधर्मी, सेक्युलर की काय अशा लोकांची विधानं आठवली. ‘कोरोनापासून वाचवायला तुमचा देव आला ना तुमचा धर्म आला. कुठे गेला तुमचा देव आणि धर्म ?’ किंवा ‘आता मंदिराच्या दानपेट्या उघडा, लोकांसाठी खुली करा’ अशा संदर्भाच्या पोस्ट कोरोना काळात सातत्याने वाचण्यात आल्या. अर्थात, या अशा पोस्ट लिहिणारे मूलनिवासी किंवा विद्रोह-बिद्रोहची झूल पांघरणारेच होते. अर्थात, त्यांनी देव मानावा की मानू नये, याबाबत त्यांना स्वातंत्र्य आहे. आपल्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे केवळ हिंदू समाज आणि श्रद्धा यावरच टीका-टिप्पणी करणे किंवा निंदा करणे असा काही लोक अर्थ घेतात. हे लोक संविधानाचे शत्रू आहेत. या अशा विचारांच्या नरकासुरांनी समाजाला अस्थिर करण्याचे कितीही प्रयत्न करू देत, मात्र, ज्या समाजात प्रभू श्रीरामचंद्रांचे पावन अस्तित्व आहे तिथे असले किती नरकासूर आले नी गेले तरी काही फरक पडत नाही. संविधानाचा राष्ट्रग्रंथ त्याच्या मूळअर्थासहित मार्गदर्शन करतच राहणार. हे सगळे सांगताना संजय राऊत यांचे विधान लक्षात घ्यायला हवे. रामराज्य येऊनही कोरोना रावण मारला जात नाही असे म्हणताना यांना रामराज्य बलशाली नसून कोरोनारूप का होईना पण रावण शक्तिशाली आहे असे सांगायचे आहे का? की त्यांना असे म्हणायचे आहे की रामराज्य कसले घेऊन बसलात रावणच ताकदवान आहे. किंवा यांना असे म्हणायचे आहे का की, रामराज्य वगैरे झूठ आहे, रावणच सत्य आहे. काय म्हणायचे काय आहे यांना? छे! रामराज्यावर अविश्वास दाखवणार्यांबद्दल काय म्हणावे? मुळात रामराज्य म्हणजे एकट्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने चालणारे राज्य का? रामराज्य म्हणजे सत्य, न्याय, लोकहित आणि शाश्वत मानवी मूल्य जपणारे राज्य. या राज्यात कोरोनाचा रावण असो की देश समाजाला अस्थिर करणारा रावण असो या असल्या रावणांचा अंत नक्कीच होणार. कारण, हा देश रामाचा आहे रावणाचा नाही.