जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेरमधील भारतीय लष्करासोबत यावर्षी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, "देशाच्या सीमांवर सैनिक आहेत, त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. देशात सण-उत्सव साजरे होऊ शकत आहेत. आज मी केवळ माझ्यातर्फेच नव्हे, तर देशातील सर्व नागरिकांतर्फे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत." पुढे ते म्हणाले की, "तुम्ही देशातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये असा, वा उष्ण वाळवंटांमध्ये असा. तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण झाल्याचे समाधान मला मिळते. तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित होतो."
ऐतिहासिक लोंगेवाला पोस्टबद्दल सांगताना ते म्हणाले की, "देशातील प्रत्येक नागरिकाला लोंगेवाला पोस्टच्या इतिहासाबाबत माहिती आहे. अनेक पिढ्या त्यांची शौर्यगाथा लक्षात ठेऊन आहेत. त्यांची ही गाथा ऐकून आजही देशवासियांना स्फुरण चढते." असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे त्यांनी चीनवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "विस्तारवादी विचारसरणीमुळे आज संपूर्ण जगाला त्रास होतो आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. विस्तारवाद ही १८व्या शतकातील विचारसरणी आहे आणि आपण सध्या एकविसाव्या शतकात आहोत. भारत देश हा या विचारसरणीविरोधात मजबूतीने उभा आहे."