नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) विविध ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात आठपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यामध्ये पाकच्या एसएसजीच्या काही कमांडोंचाही समावेश आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याचे तीन जवानदेखील हुतात्मा झाले आहेत.
भारतीय सैन्याकडून प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर विविध ठिकाणी पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. उरी सेक्टर त्याचप्रमाणे बांदिपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इजमर्ग, कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर येथे पाक सैन्याकडून हा प्रकार करण्यात आला. पाक सैन्याने मॉर्टर आणि अन्य शस्त्रांचा वापर केला. मात्र, भारतीय सैन्याने पाकच्या या प्रयत्नांना उधळून लावले असून प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये पाकचे आठहून अधिक सैनिक ठार करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाक सैन्याचे बंकर, इंधन डेपो आणि लॉन्च पॅडदेखील पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पाककडून झालेल्या गोळीबारामध्ये उरी सेक्टरमधील नांबला येथे भारतीय सैन्याचे २ जवान हुतात्मा झाले तर हाजीपीर सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरिक्षक हुतात्मा झाले असून अन्य सैनिक जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे उरी सेक्टरमध्ये कामलकोटा येथे २ नागरिक तर हाजीपीरमध्ये एका महिलेचा पाकच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.