एका दिवसात झाली आईसोबत पुनर्भेट
मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. सोमवारी हे पिल्लू आदिवासी पाड्यानजीक बेवारस अवस्थेत सापडले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या बिबट्यावर उपचार केले. वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने त्याच रात्री पिल्लाची आईसोबत पुनर्भेट घडवून त्याला नवीन जीवदान दिले.
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे एक पिल्लू बेवारस अवस्थेत सापडले होते. तुळशी परिक्षेत्रामधील मालाड परिसरात कळंबाचा फोंडा नावाच्या पाड्यातील आदिवासींना हे पिल्लू दिसले. साधारण चार ते पाच महिन्यांचे मादी प्रजातीचे हे पिल्लू थकलेल्या अवस्थेत निपचिप पडून होते. आदिवासींनी या घटनेची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांना दिली. उद्यानातील वन्यजीव बचाव पथकाने या पिल्लाला तातडीने ताब्यात घेऊन या पिल्लांवर उपचार केले. त्यानंतर उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी.मल्लिकार्जुन यांनी या पिल्लाचे वय पाहून त्याला पुन्हा त्याच्या आईकडे सुपुर्त करण्याचा निर्णय घेतला.
संचालकांच्या आदेशानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता तुळशी परिक्षेत्राचे अधिकारी, मुंबई उपनगरचे मानद वन्यजीव रक्षक मुयर कामत आणि वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत पिल्लाला सोडण्याच्या कामाला सुरू झाली. पिल्लू सापडलेल्या जागेपासून ७० ते १०० मीटरच्या अंतरामध्येच ठेवून त्याची आई येण्याची वाट पाहण्यात आली. त्यानंतर रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास मादी याठिकाणी आली आणि पिल्लाला घेऊन गेल्याची माहिती संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. साधारणपणे प्रसुती झालेली मादी बिबट्या ही पिल्लांसोबत लहान शिकारीच्या शोधात मानवी वस्तींसोबत वावरत असते. अशाच प्रसंगी हे पिल्लू तिच्यापासून वेगळे झाल्याचा अंदाज मानद वन्यजीव रक्षक मयुर कामत यांनी वर्तवला. हे पिल्लू आदिवासी पाड्याजवळ असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तिथून उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्यामध्ये स्थानिकांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.