मुंबई : बिहार निवडणुकीचा आज निकाल समोर येत आहे. दुपारी १ पर्यंत आलेला कौल हा भाजप आणि एनडीए बाजूने आला आहे. एनडीए ही १२८ जागांवर तर राजद आणि कॉंग्रेस हे १०९ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, कॉंग्रेस फक्त २० जागांवर आघाडीवर आहे. यामुळे आता भाजपने कॉंग्रेस आणि राहुल गांधीवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 'राहुल गांधींसोबत ज्यांनी हात मिळवले ते डूबलेच आहेत.' असा टोला लगावला.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे की, " कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी हात मिळवले ते डूबलेच आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात कॉंग्रेसने आघाडी केली. तेव्हा समाजवादी पक्षही पराभूत झाला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले, ममता बॅनर्जींसमोर डावे सपाटून हरले. आणि आता तेजस्वी यादव यांच्यासोबत काँग्रेस गेली आहे आणि इथेही ते पराभवाच्या छायेत आहेत." असा चिमटा काढत त्यांनी बिहार निवडणुकीवर आपले मत व्यक्त केले आहे.