रिपब्लिक टीव्ही विरोधात मुंबई पोलीसांचा आरोप
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरण लावून धरणारी हिंदी वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्ही विरोधात मुंबई पोलीसांनी आता शड्डू ठोकले आहे. रिपब्लिक टिव्ही विरोधात आमच्याकडे पुरावे आढळले आहेत, असा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. टीआरपीच्या आकडेवारीशी छेडछाड केल्याचा आरोप मुंबई पोलीसांनी केला आहे. टीआरपीमध्ये क्रमांक १ वर येण्यासाठी मानांकनाच्या प्रमाणाशी छेडछाड केल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी ही कबुली दिल्याचे म्हटले आहे. रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर आणि निर्देशक यात सामील, असल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे. तसेच 'फक्त मराठी' तसेच 'बॉक्स सिनेमा' या चॅनल्सच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. टीआरपी मीटर लावण्यात आलेल्या ठिकाणच्या प्रेक्षकांना आपला चॅनल्स लावण्यासाठी लाच दिल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीसह अन्य काही वाहिन्यांवर हा आरोप लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुंबईत अशा प्रकारे दोन हजार ठिकाणी हा प्रकार उघड केल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. संपूर्ण देशभरात हे रॅकेट आहे का याबद्दल आता पोलीसांचा तपास असणार आहे. या प्रकरणात चॅनलचे मालक आणि संपादकांनाही सन्मस बजावण्यात येणार आहे. मुंबई पोलीसांच्या या दाव्यानुसार, टीआरपी रँकींगशी छेडछाड झाली असून त्यानुसार त्याचा वापर जाहिराती आणि महसुल मिळवण्यासाठी केला, असा आरोप करण्यात आला आहे.