मुंबई : सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा अहवाल एम्सच्या पथकाने दिला आहे. नेटिझन्सनी यानंतर सोशल मीडियावर कंगना रणौतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. #KanganaAwardWapasKar हा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू आहे. कंगनाने देखील टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझा एकही आरोप चुकीचा ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, हे एका क्षत्रियाचे वचन आहे, असे कंगना म्हणाली.
कंगनाने #KanganaAwardWapasKar या ट्रेन्डसोबत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. यात ती म्हणते, “ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही”, असे उत्तर कंगनाने दिले आहे.एका मुलाखतीमध्ये कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केले होते. त्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येला तिने खून असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये दावे खोटे ठरले तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे कंगनाने म्हटले होते.दरम्यान, कंगना रणौत सध्या जयललिता यांच्या जीवनावरील थलायवी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.