अहमदनगर : 'करोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र, देशाचे नेते शरद पवार सांगतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. मात्र शरद पवार स्वत: या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. राज्याचे कॅप्टन मात्र घरात आहे या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय,' अशी घणाघाती टीका माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी केली.
कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे.नगर तालुक्यातील खडकी येथील एडीसीसी बँकेत झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील करोना स्थितीवरून राज्य सरकारवर हल्ला चढवला.
ते म्हणाले, 'करोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार हे प्रत्यक्षात अपयशी ठरले आहे. हे मी नाही तर सर्वसामान्य जनता देखील बोलत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. आयसीयूची व्यवस्था नाही. मेडिसिन वेळेवर मिळत नाही. लाखो रुपये हॉस्पिटलला द्यावे लागतात. हे सर्व पाहता करोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचे पाहण्यास मिळते. दुसरीकडे देशाचे नेते शरद पवार सांगतात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन आहेत. कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही. त्यांना फिरू दिले जात नाही, आणि पवार साहेब मात्र या वयामध्ये जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. त्याच्यामागे असाही हेतू दिसतोय की, राज्यातील शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल एवढाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचे पाहण्यास मिळतय,' असेही त्यांनी स्पष्ट केले.