नवी दिल्ली : कोरोना महामारीकाळात लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असणारी चित्रपटगृहे अखेर १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली आहे. ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी माहिती आणि प्रसारण विभाग नव्याने नियमावली जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले.
नव्या नियमावलीनुसार चित्रपटगृहांमध्ये मास्कचा वापर तसेच सॅनिटायझर सोशल डिस्टन्स व अन्य कोरोनाच्या नियमांचे पालन होणे सक्तीचे असणार आहे. महाराष्ट्रातही चित्रपट आणि नाट्यगृहे कधी उघडणार याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. २३ मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स यावर बंदी आली होती. चित्रपटगृह बंद झाल्याने त्याच्याशी संलग्न उद्योगधंद्यांवरही विपरीत परिणाम झाला.
संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. यानंतर लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी केली जात होती. मात्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ही मागणी मागे ठेवला होता. अखेर 'अनलॉक ५.०'मध्ये चित्रपटगृह सुरू होणार असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच नवी नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सिनेसृष्टी पूर्ववत होण्यासाठी हातभार लागणार आहे.