मुंबई : पंजाबमध्ये सध्या कॉंग्रेसचे राहुल गांधी ‘शेती वाचवा’ आंदोलनासाठी ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या विधेयकाविरोधात ही आंदोलने करत आहेत. मात्र, या आंदोलनात राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्त्येच दिसत आहेत. यामध्ये सामान्य शेतकऱ्यांचा सहभागच नव्हता, अशी टीका आता करण्यात येत आहे. याशिवाय भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील ‘राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात फक्त ट्रॅक्टर, सभांमधून शेतकरी मात्र गायब होते’ अशी टीका केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले की, “राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात फक्त ट्रॅक्टर, सभांमधून शेतकरी मात्र गायब! खरा शेतकरी मोदी सरकारच्या नवीन शेती विषयक कायद्याचे फायदे पुरेपूर जाणतो. तो कशाला फिरकेल अशा बोगस आंदोलनाकडे?. काँग्रेससाठी खरा शेतकरी मात्र रॉबर्ट वाड्राच आहे.” अशी टीका केली आहे. राहुल गांधी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी फारच कमी शेतकरी उपस्थित आहेत. यामुळे आता त्यांच्या या आंदोलनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.