नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि चीनमध्ये चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. ओडिशामधील बालासोर येथे ही चाचणी घेण्यात आली. याचे वैशिष्ठ म्हणजे जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. तर दुसरे, ८०० किमीवरील शत्रूला भेदण्याची क्षमता या नव्या आवृत्तीचे आणखी एक वैशिष्ठ आहे.
या क्षेपणास्त्रामुळे भारताची सध्याची क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलके आणि सोपे आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र ४०० किमी पर्यंतच्या अंतरावरील टार्गेट उध्वस्त करु शकते. डीआरडीओने ओडिशाच्या बालासोरमध्ये जमिनीवरुन पीजे-१० प्रकल्पांतर्गत या क्षेपणास्त्राची चाचणी केली, या क्षेपणास्त्राला स्वदेशी बूस्टरसोबत लॉन्च करण्यात आले होते.