नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राजकारण तापू लागल्यानंतर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रीस्मृती इराणी यांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नक्कीच न्याय करतील असे म्हटले आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचे हाथरसला जाणे हे राजकारण असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाराणसीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी हे नेहमीच राजकारण करण्यासाठी अग्रेसर असतात, मात्र राष्ट्रनीतीमध्ये नरेंद्र मोदी हेच यशस्वी झालेले असल्याचे त्या म्हणाल्या. स्वतंत्र झालेल्या देशाने काँग्रेसचे चाल ओळखली असल्याचे मला वाटते. कोणीही नेता कोणत्याही विषयात राजकारण करू पाहत असेल तर मी त्यांना रोखणार नाही, मात्र हाथरसला भेट देणे हे केवळ राजकारण असून यात पीडितेला न्याय देण्याचा उद्देश नसल्याची टीका इराणी यांनी केली आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, मला काही घटनात्मक मर्यादा आहेत, म्हणून मी कोणत्याही राज्यांमधील प्रकरणात लक्ष घालत नाही. मात्र, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीचे गठन केले आहे. कालच पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचा अहवाल येऊ द्या. त्यानंतर ज्या लोकांनी हस्तक्षेप केला किंवा ज्यांनी पीडितेला न्याय मिळू नये यासाठी कट रचला, अशा लोकांविरोधात योगी कठोर कारवाई करतील,तसेच राहुल गांधी यांनी गहलोत सरकारलाही फोन करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.