ठाकरे ‘घुसपैठिए’, तरी कौतुक?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2020   
Total Views |

vedh_1  H x W:



लालुप्रसाद यादव यांनी ठाकरे परिवारालाच ‘महाराष्ट्रातील घुसपैठिए’ संबोधत त्यांनी महाराष्ट्रातून चालते व्हावे, अशी वल्गना केली होती. त्यावर बाळासाहेबांनीही लालू यादवांचा ‘सामना’तून चांगलाच समाचार घेतला होता. पण, दुर्दैव हेच की ठाकरेंना महाराष्ट्रातील ‘घुसपैठिए’ संबोधणार्‍या लालुपुत्राचेच गुणगान गाताना संजय राऊत यांना आज शब्द कमी पडले. आता याला बिहारचे सुदैव म्हणावे की महाराष्ट्राचे दुर्दैव?


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आज त्यांचे पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वाटचाल करणारी शिवसेना, यात खरे तर जमीन-आस्मानाचेच अंतर. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेली सत्ताशय्या असो, वा हिंदुत्ववादी भाजपशी घेतलेली फारकत, असे जे जे बाळासाहेबांच्या हयातीत केवळ स्वप्नवत वाटावे, ते ते सगळे आजच्या शिवसेनेने ‘करून दाखवले.’ सत्तामोह माणसाला अंधळा करतो, असे म्हणतात. पण, शिवसेनेच्या बाबतीत तर सत्तेसाठी ज्या हिंदुत्वावर, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, जो शिवसेनेचा पाया होता, तोही आज डळमळीत झालेला दिसतो. कोणे एकेकाळी बाळासाहेबांनी ज्या लालू यादवांवर ‘सामना’तून आसूड ओढले, त्याच शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक मात्र आज तेजस्वी यादवांवर कौतुकवर्षाव करताना दिसले, “तेजस्वी यादव युवा नेते आहेत. ते खूप मेहनती आहेत. एकटे सगळ्यांविरोधात लढतायत. बिहारमध्ये दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा तरुणांनाही पटला असून, तरुणवर्गही तेजस्वीबरोबर आहे,” अशी तेजस्वीवर स्तुतिसुमने उधळताना राऊत यांचा चेहरा खुलला होता. जणू काही नितीशकुमारांची गच्छंती अटळ असून, लालपुत्र तेजस्वी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, या थाटात राऊतांनी तेजस्वीच्या अचाट कर्तृत्वाचे अगदी गोडवे गायले. पण, कदाचित बाळासाहेबांच्या शिवसेनेतही ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदी राहिलेल्या संजय राऊतांना काही गोष्टींचा विसर पडलेला दिसतो किंवा पुन्हा त्याकडे सपशेल डोळेझोक करण्यात त्यांनी धन्यता मानली, असेच म्हणता येईल. काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांनी बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय हे मूळचे बिहारचे असल्याचे सांगून २०१२साली एका नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यावर तेजस्वीचे पिताश्री आणि चारा घोटाळ्याची मलई खाणारे लालुप्रसाद यादव यांनी ठाकरे परिवारालाच ‘महाराष्ट्रातील घुसपैठिए’ संबोधत त्यांनी महाराष्ट्रातून चालते व्हावे, अशी वल्गना केली होती. त्यावर बाळासाहेबांनीही लालू यादवांचा ‘सामना’तून चांगलाच समाचार घेतला होता. पण, दुर्दैव हेच की ठाकरेंना महाराष्ट्रातील ‘घुसपैठिए’ संबोधणार्‍या लालुपुत्राचेच गुणगान गाताना संजय राऊत यांना आज शब्द कमी पडले. आता याला बिहारचे सुदैव म्हणावे की महाराष्ट्राचे दुर्दैव?


बाळासाहेबांचे ‘ते’ शब्द आठवा!


खरं तर बाळासाहेब असतानाचा ‘सामना’ आणि त्यांच्यानंतरचा ‘सामना’ हा राजकारणात भूमिका कशा 360 अंशाच्या कोनात कालौघात बदलतात, त्याचे ‘ज्वलंत पुरस्कार करणारे’ उत्तम उदाहरण! ‘सामना’ आणि प्रदीर्घ मुलाखत म्हटली की, ती फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच. पण, ती परंपराही नुकतीच मोडीत निघाली. पण, बाळासाहेब ठाकरेंनी याच ‘सामना’च्या माध्यमातून आपल्या विरोधकांना त्यांची जागा वेळोवेळी आपल्या शाब्दिक बाणांतून दाखवून दिली होती आणि त्यापैकीच एक होते तेजस्वी यांचे पिताश्री लालुप्रसाद यादव. सध्या बिहार निवडणूक ऐन रंगात असून, मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, ते काही दिवसांत स्पष्ट होईलच. काल बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील ७१ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. पण, याच पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारी लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या समर्थनार्थ संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे काही जुन्या आठवणी स्मृतिपटलावर आल्या. २०१२साली नितीशकुमार आणि मोदींचा हात मिळवितानाचा फोटो पाहून लालुप्रसाद यादव यांचा झळफळाट झाला होता. त्यावर बाळासाहेबांनीही लालू यादवांवर खरमरीत टीका केली होती. नितीशकुमार आणि मोदींनी हातमिळवणी केली म्हणून धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याचा कांगावा लालू प्रसाद करत असल्याचे बाळासाहेबांनी म्हणत, चक्क लालूंना ‘लफंडर लालू’ म्हणून संबोधले होते. एवढेच नाही, तर “लालू यादव संपले आहेत. लालूंचे डोके आता ठिकाणावर नाही. खुर्ची नाही म्हणून लालू काहीही बरळत असून नितीशकुमारांनी लालूंचे ‘गुंडाराज’ संपुष्टात आणले आणि बिहारचा विकास झाला” या शब्दांत बाळासाहेबांनी चारा घोटाळ्यातील भ्रष्टाचारी लालू यादवांचा खरपूस समाचार घेतला होता. पण, आज तीच शिवसेना तेजस्वीच्या कौतुकात दंग दिसते. खरं तर शिवसेनाही बिहार निवडणुकीमध्ये ४०-५०जागांवर मैदानात उतरली आहे. पण, राजद आणि काँग्रेसच्या महागठबंधनामध्ये ती सहभागी नाही की, तसा शिवसेनेेने कोणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही. पण, काहीही करून भाजप-जदयु सत्तेतून पायउतार व्हावे, हीच सेनेची इच्छा, म्हणूनच मग लालूपुत्र तेजस्वीही यांना सर्वार्थाने ‘तेजस्वी’ वाटू लागतो. परंतु, ‘भूमिकाबदल’ हीच ओळख असलेल्या शिवसेनेला आता बाळासाहेबांचे ‘ते’ शब्द आठवले तरी आचरणात कदापि आणता येणार नाहीत, हेच राजकीय सत्य!
@@AUTHORINFO_V1@@