नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दार्जीलिंगच्या सुकना वॉर मेमोरिअल येथे शस्त्रपूजन केले. ते म्हणाले, "चीनसोबतचा तणाव शांत व्हावा, अशी भारताचीही इच्छा आहे. या भागात शांततापूर्ण वातावरण असेल, अशी माझी पूर्ण खात्री आहे. तसेच आपल्या सैन्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे की, ते एक इंचभर जमिनही कुणाला बळकावू देणार नाहीत."
संरक्षणमंत्री पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणेही उपस्थित आहेत. राजनाथ सिंह यांनी विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या. भारतीय सैन्यदलाच्या जवानांना भेटून मला आनंद होतो, त्यांचे मनोबल कायम वाढतच असते. त्यांचे जितके कौतूक करावे तितके थोडेच आहे. राजनाथ सिंह यांनी शनिवारी दार्जीलिंगच्या सुकाना येथे २२ कोर मुख्यालयात पूर्व सेक्टरमध्ये सैन्यदलाच्या तयारीचा आढावा घेतला.
सैनिकांचे नाव सुवर्णाक्षरात लिहीले जाईल
संरक्षण मंत्री म्हणाले, लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे काही झाले त्याचा आपल्या सैनिकांनी धाडसाने सामना केला. इतिहासकार या जवनांचे साहस आणि वीरता सुवर्णाक्षरात लिहीतील. लडाखच्या घाटीमध्ये १५ जून रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. चीनचेही ४० हून अधिक जवान मारले गेले. सीमेवर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सातवेळा चर्चा बैठका झाल्या. भारतातर्फे चीनी सैन्याचा सामना करण्यासाठी ६० हजार सैनिकांचा फौजफाटा सुसज्ज ठेवण्यात आला आहे.