मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने सीबीआयला मोठा झटका दिला आहे. यापुढे सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही तपास आपल्या हाती घेऊ शकत नाही, असे नुकतेच गृहविभागाने स्पष्ट केले आहे. असे निर्बंध घालणारा महाराष्ट्र हे चौथे राज्य ठरले आहे. याआधी राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी सीबीआयवर निर्बंध घातले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारवर चांगलीच टीका होत आहे.
“सीबीआयला महाराष्ट्रात प्रवेश नाही, असे ठाकरे सरकार म्हणत आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हातात गेली तर सर्व बाहेर येतील, अशी त्यांना भीती वाटते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयच्या सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला.” असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे.