ठाणे : जनजीवन सुरळीत व्हावे, आर्थिक चक्र पुन्हा सुरू व्हावे म्हणून राज्य सरकारने अनेक निर्णय घेत पर्यटनस्थळेही उघडली,परंतु महाराष्ट्राची आणि शिवभक्तांची स्फुर्तीस्थाने असलेले गडकिल्ले कुलुपबंद का? असा सवाल करत सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष भाजप आ. संजय केळकर यांनी गडकिल्ले खुले करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील दुर्ग, गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची,पराक्रमाची स्थाने आहेत. शिवभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी प्रेरणास्थाने असलेली ही स्थाने कोरोनाकाळात बंद आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे दुर्ग आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहे, दुर्गमोहिमा आखल्या जात आहेत. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दस-याला दुर्गपूजा केली जाते.
मात्र, यंदा ही पवित्रस्थळे बंद असल्याने शिवभक्तांची घोर निराशा झाल्याची भावना आ.केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये अनेक निर्बंध शिथिल केले. पर्यटनस्थळेही पर्यटकांसाठी खुली केली.या पार्श्वभूमीवर शिवभक्त आणि पर्यटकांसाठी दुर्ग आणि गड-किल्लेही खुले करावेत, अशी मागणी आ.केळकर यांनी पत्रात केली आहे.