मुंबई : सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची पिकं या पावसात वाहून गेली आहे. काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये काही जणांना जीव देखील गमावावा लागला आहे. असे असताना मुख्यमंत्री मात्र बॉलिवूड वाचविण्यासाठी चिंतातुर असल्याची टीका विरोधी पक्ष भाजपने केली आहे. 'शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ; राजा मात्र बॉलिवूडसाठी चिंतातुर', अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आशिष शेलार ट्विट करत म्हणतात, "आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट...महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले...शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर..तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले ! मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय..त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना पब,बार, रेस्टॉरंट रात्री ११.३०पर्यंत खुले ठेवून"नाईटलाईफची"काळजी "राजपुत्र" करीत आहेत..दुर्दैवी चित्र.."महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा !" अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केली.
दरम्यान, 'मुंबईतून बॉलीवूडला संपवण्याचे अथवा इतरत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सध्या बॉलीवूडला एका विशिष्ट वर्गाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे वेदना दायक आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला होता.