मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारी अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक होता. सोलापूर, सातारा आणि सांगलीत जोरदार पाऊस झाला आहे. पुढील १२ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट आहे.येत्या दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर असेल. उत्तर कोकणामध्ये, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईमध्ये रात्री सतत पाऊस सुरू असल्याने दादर हिंदमाता परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे. आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परतीच्या पावसाने कोकणातही संततधार कायम ठेवली आहे. त्यामुळे कापणीला आलेली भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भातपीक धोक्यात आले आहे. कोंडये तेलीवाडी (ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) येथील मयूरी मंगेश तेली (३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली.
संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर, लातूर आणि उस्मानाबादमध्ये ढगफुटीसारखा धो-धो पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पंढरपुरात घाटाची भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर सिंधुदुर्गमध्ये एक महिला वाहून गेली. गुरुवारी संपूर्ण कोकणला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठावर कुंभारघाटाजवळ नव्या घाटाचे काम सुरू आहे. येथे लोकांनी झोपड्या बांधल्या होत्या. घाटाची २० फूट भिंत कोसळल्याने गोपाळ अभंगराव, राधाबाई अभंगराव, मंगेश अभंगराव, संग्राम जगताप (१२) यांच्यासह अन्य दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.