पुणे : कोरोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यामध्ये अनलॉकची सुरुवात केल्यानंतर युजीसीच्या निर्णयावर राज्य सरकारचे एकमत झाले नाही. त्यानंतर आता राज्यातील अनेक विद्यापीठांनी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेला विलंब आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे विद्यार्थी आधीच तणावात आहेत. मात्र, विद्यापीठाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. त्या ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सोयीस्कर पर्यायाची निवड केली. असे असले तरीही अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागली. तीन -चार तास थांबुन देखील परीक्षा वेळेत होत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभारवर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.