छे छे! हे आम्ही कसे खपवून घेऊ? चाय, बिस्कूट पत्रकार म्हटले म्हणून माझ्या माणसाने त्या परप्रांतीय पत्रकारड्याला जाम चोपले. बिस्कीटाचा असा आम्हाला मनस्वी राग.. आणि आम्हाला बिस्कीट निशाणी द्यावी. नाही नाही हे होणे नाही. कोथळा काढणारे आम्ही, वाघनखे बाळगणारे आम्ही. तुम्ही आम्हाला बिस्कीट देता. अरे तुम्ही ढाण्या वाघाला बिस्कीट खायला लावता? मी याचा तीव्र निषेध करतो. ही असली बिस्कीट निशाणी घेऊन आम्ही त्या परमुलखात परप्रांतात कशी निवडणूक लढवणार? ‘अरे निवडून निवडून येणार कोण? बिस्कीटशिवाय आहेच कोण?’, ‘अरे आवाज कोणाचा बिस्कूटचा.’ या असल्या घोषणा कशा द्यायच्या? बिहारी भाषेत आम्हाला आपलं, ‘कैसन बा, ठिक बा, हमार निशान बिस्कूट बा...’ इतकंच म्हणता येईल. मग तिथे लोकांना आम्हाला आमचा आवेश कसा दाखवता येईल? आम्ही मर्द मराठे आहोत, असे तिकडे सांगून चालणार नाही हे आम्हाला समजते बरं का? काय म्हणता, आम्ही जसे इथे बिहारींना भैये, परप्रांतीय म्हणतो, तसे बिहारींनी आम्हाला म्हटले तर काय करायचे? तिथेही घर असेलच, आम्ही तिथे फेसबुक लाईव्ह करू. काय म्हणता, बिहारी आम्हाला का मत देतील? का मोदींचा काय? ट्रम्पचासुद्धा रेकॉर्ड मोडू शकतो. ‘हू’, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आमची आडून आडून का होईना आमची दखल घेतली आहे. समजलं का? त्यामुळे बिहारच्या भैय्यांना, चुकलं मला म्हणायचे होते माझ्या बिहारी बांधवांना मलाच मतदान करावं लागेल. कारण की, मी वचन दिले आहे की आता नॅशनल राजकारण करणार. काकांनीच का, भावी पंतप्रधान म्हणून जिथे तिथे भाव खावा. त्यात काय म्हणता? मुख्यमंत्री व्हायचे वचन पिताश्रींना दिले होते, तसे पंतप्रधान व्हायचे वचन कुणाला दिले? तर तसे वचन मी मलाच दिले आहे. काय म्हणता, तो बिहार आहे महाराष्ट्र नाही. नसू देत मला काय करायचे आहे. बिस्कूट दिले तर माझ्याकडे कोमट पाणी आहेच की...
आता नजरेतून सगळेच पडले...
हाथरसमध्ये भाभीजीचे कांड उघड झाले. पण, नुसती भाभीजी एकटी नाही तर तिच्यासोबत तिच्यासारखाच दुष्ट समाजविघातक गोतावळा असणारच. किती भयंकर आहे हे सगळे! डॉक्टर असलेली एक नक्षली विचारांची महिला मध्यप्रदेशहून हाथरसला येऊन पीडितेच्या घरात राहते. तिला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षक असलेले पत्रकार भेटतात. इतकेच काय? राजकुमारी प्रियांका गांधीही येतात. त्या दुर्दैवी मुलीच्या खोट्या भाभीजीची गळाभेट घेतात. इथे खूप सारे प्रश्न आहेत. कोरोनाकाळात एखाद्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीची एखाद्याला भेट घ्यायची असेल तर नियमावली आहे. कारण, एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असेल तर त्या व्यक्तीपासून महत्त्वाच्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये. मग, काँग्रेसच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असलेल्या प्रियांका गांधींनी कोरोनाची नियमावली का पाळली नाही? प्रियांकांनी सरळ त्या महिलेची गळाभेट घेतली? साधा नगरसेवकही कुणाच्या घरी भेट देणार असतील, तर त्या कुटुंबाचा पूर्ण इतिहास आणि पार्श्वभूमी तपासली जाते. तिथे गेल्यावर काय करायचे, कुणाला भेटायचे वगैरेची रचना आखली जाते. प्रियांका गांधी तर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्यामुळे हाथरस कुटुंबाला भेटण्याआधी इतकी काळजी नक्कीच घेतली असणार. तरीही प्रियांका गांधींनी त्या मुलीच्या आईऐवजी त्या भाभीजीची गळाभेट का घेतली? मुख्य म्हणजे, आपली मुलगी मेली, गावातले वातावरण तणावपूर्ण आहे. अशावेळी अनोळखी महिलेला घरात ठेवणार्या आणि तिला आपल्यावतीने प्रसारमाध्यमांशी बोलू देणार्या कुटुंबाबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात. त्यातूनच मग ‘नार्को टेस्ट’ला या कुटुंबाचा नकार का? याबद्दल संशय येतो. भाभीजी नक्षली लागेबांधे असलेली आहे, असे प्रथमदर्शनी तरी दिसते, मग ती हाथरस पीडितेच्या घरी काय करत होती? की काँग्रेस, भीम आर्मी आणि तथाकथित सेक्युलॅरिस्टांनी कोल्हेकुई केली की समजावे, ‘ये सब मिले हुये है?’ यांचा अजेंडा तोच, जो रोहित वेमुलाच्या वेळी होता, जो कोरेगाव-भिमा वेळी होता, जो दिल्ली दंगलीवेळी होता. राजकुमार हाथरसला पडले. पण, भाभीजी प्रकरणाने तर त्यांचा समविचारी गोतावळाच भारतीयांच्या नजरेतून पडला...