सातारा : लॉकडाऊनमध्ये सातारा, सांगली कोल्हापूरला मुंबईशी जोडणाऱ्या ट्रेन बंद होत्या. अखेर अनलॉक ५मध्ये या गाड्या पुन्हा एकदा रुळांवर धावताना दिसणार आहेत. कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस पाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसही सुरू होत आहे. दि. २० ऑक्टोबरपासून ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेतला आहे. दि. १५ ऑक्टोबरपासून गाडीचे आरक्षण सुरू होणाची शक्यता आहे.
कोल्हापूर येथून सुटणाऱ्या आणि मिरजमार्गे धावणाऱ्या कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस यापूर्वी सुरू करण्यात आल्या आहेत. आता महालक्ष्मी एक्स्प्रेसही सुरु होणार आहे. परंतु, ही गाडी सिकंदराबाद विभागाची असून कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-मुंबई जोडत असल्याने ही गाडी सुरू होण्यामध्ये अडचणी असल्याचे मिरज रेल्वे कृती समितीचे सुकुमार यांनी सांगितले. रेल्वेकडून आता आरक्षणामध्ये देखील बदल करण्यात येणार आहे. संबंधित गाडीची पहिली आरक्षण यादी चार तास आधी तर दुसरी आरक्षण यादी ३० मिनिटे आधी बनविली जाणार आहे.