किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती
मुंबई : मेट्रोची आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, तसेच मेट्रो अजून पाच वर्षे उशीराने धावेल, अशी भीती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या काळात पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र, महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती.
यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मेट्रो कारशेडची जागा बदलण्यात येणार असल्याने किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. आरे कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित झाल्यास या प्रकल्पाची किंमत 5 हजार कोटींनी वाढेल. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील. कारशेड कांजूरमध्ये गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल.
तसेच सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का, उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.