चंदिगढ : 'ऑपरेशन मेघदूत'चे नायक म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून (पी. एन. हून) यांचे पंचकुला येथील रुग्णायलात सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.पश्चिम कमांडचे प्रमुख असताना १९८७ मध्ये लेफ्टनंट जनरल हून लष्करातून निवृत्त झाले होते. दरम्यान, २०१३ मध्ये जनरल हून यांनी राजकारणात उतरत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीनमध्ये लेफ्टनंट जनरल हून यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी तिरंगा फडकावला होता. या मोहिमेलाच 'ऑपरेशन मेघदूत' असे नाव देण्यात आले होते. प्रकृती ढासळल्याने हून यांना पंचकुलातील चांदीमंदीर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच सायंकाळी ५.३०वाजता त्यांचे निधन झाले. १९८०च्या दशकात पाकिस्तानने सियाचीनमार्गे घुसखोरी सुरू केली होती. सियाचीनच्या टापूवर कब्जा करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. पाकचा हा डाव उधळून लावण्यासाठीच १९८४ मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत ही धाडसी मोहीम आखली. जनरल हून यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. सियाचीनमधील भारताचे ऑपरेशन हे जगातील सर्वात धाडसी लष्करी कारवायांमध्ये गणले जाते. उणे तापमानात भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानी सैन्याला पराभवाची धूळ चारली होती.