पेशावर : नानकाना साहिब गुरुद्वारावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच शीख समाजाच्या एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी घडला. रविंदर सिंग असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकारानंतर पाकिस्तानातील शीख समाजातील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर भारतातील परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कडाडून टीका केली. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समाजातील बांधवांवर अत्याचार होत आहेत. मात्र तेथील तपास यंत्रणा मूग गिळून गप्प आहेत. पाकिस्तान सरकारने याची गंभीर दखल घेऊन या घटनेचा तपास करण्याची मागणी भारताने केली. ‘पाकिस्तानने दुसऱ्यांना उपदेश देण्यापेक्षा आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांना सुरक्षा द्यावी, पेशावरमधील कृत्याचा कठोर शब्दात निषेध करतो आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी करतो,’ असे भारताने सुनावले आहे.
रविंदर सिंग असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अलीकडेच हा तरुण विवाहासाठी मलेशियातून पाकिस्तानात परतला होता. तो खैबर पख्तूनख्वां प्रांतातील शांगला जिल्ह्याचा रहिवासी असून, विवाहानिमित्त खरेदी करण्यासाठी तो पेशावर येथे गेला होता.