मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी एक शेतकरी आपल्या मुलीसह मदतीच्या आशेने आले होते. मात्र, पोलिसांनी या शेतकऱ्यासोबत अरेरावी करत, मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. यावर मंत्री बच्चू कडू यांनी मुंख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला. बच्चू कडू म्हणाले, "शेतकऱ्यांची अडवणूक चुकीची आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे,'' असे म्हणत बच्चू कडूंनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
''मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जलसंपदाही अत्यंत महत्त्वाचे खाते आहे, विदर्भात त्याची गरज आहे. महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लाग आहे. त्यासाठी पाणी नियोजन करू, भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगले अधिकारी असतील त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र विनाकारण त्रास दिला तर बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून जाणार,'' असा इशारा बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना दिला.
'मातोश्री' बाहेरील शेतकऱ्याचे म्हणणे नेमके काय ?
पनवेल येथील शेतकरी आपल्या लहान मुलीसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचा कर्जाचा डोंगर आहे. बँक त्यांची कोंडी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. तरीसुद्धा बँक आपली अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. पोलिसांनी शेतकरी आणि त्याच्या सात वर्षीय मुलीला ताब्यात घेतले होते. दरम्यान मातोश्रीवर आलेल्या या शेतकऱ्याला पोलिसांना सोडण्यास सांगितले आहे , तसेच त्याचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. दरम्यान, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.