ठाणे : कवी समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात.त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात. त्या वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘छंद आनंद’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांनी भूषविले. कवी शिवराम (महेश) टक्के यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात झाले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रदीप ढवळ, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, एकनाथ पवळे तसेच ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘ही आनंदाची बाब’
महापालिकेच्या वातावरणात राहून महेश टक्के यांनी आपली ही कला जोपासली आहे, त्यांच्या कविता या सामाजिक जीवनावर भाष्य करणार्या असल्या तरी हा कवी हळवा असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच महापालिकेतील कर्मचारी सुध्दा आपले कामकाज सांभाळून आपली कला जोपासत आहेत ही खरोखर आनंदाची बाब असल्याचे सांगत महापौरांनी शिवराम टक्के यांना शुभेच्छा दिल्या.