राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही. टी. तुसेदादा यांचे नुकतेच निधन झाले. तुसेदादा यांच्या कार्याची ओळख करुन देणारा हा श्रद्धांजलीपर लेख...
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. आणीबाणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रहारच होता. कोणतेही कारण न देता राजकीय विरोधकांची ‘मिसा’ कायद्याखाली संपूर्ण देशभर धरपकड सुरू झाली होती. देशात अराजकता, दहशत निर्माण झाली होती. इंदिरा गांधींना विरोध करणारा तो देशद्रोहीच ठरवून हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात येत होते. सर्वदूर अंध:कार पसरलेला होता. सकाळी व्ही. टी. तुसेदादा देवपूजा करीत बसले होते आणि दारावर हवालदार हजर. दादांनी हसतमुखाने हवालदाराचे स्वागत केले. सर्व मुले लहान, कुटुंबामध्ये प्रचंड चलबिचल, गल्लीतील सर्व लोक जमा झालेले. स्थितप्रज्ञ असणार्या व्ही. टी. दादांनी सर्वांना धीर दिला आणि अंगावरच्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाह असणार्या वाल्मिकराव तुसे तथा व्ही. टी. दादांना अटक झाल्याची बातमी वार्यासारखी नांदगावमध्ये पसरली. स्थानिक पुढार्यांनी पोलीस ठाण्याला हजेरी लावली होती.
पोलीस अधिकार्यांनी दादांसमोर व मध्यस्थी करणार्या स्थानिक पुढार्यासमोर प्रस्ताव मांडला. दादांनी लिहून द्यावे माझा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी कुठलाही संबंध नाही व भविष्यातही असणार नाही. दादा ज्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते होते, त्या मुशीत ‘तडजोड’ हा शब्द नव्हताच. दादांनी स्पष्टपणे तेथे उपस्थित असणार्यांसमोर पोलीस अधिकार्यास सांगितले, "कायद्याप्रमाणे तुम्ही कार्यवाही करा मी स्वयंसेवक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वयंसेवकच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळ दवडू नका. नांदगावातील हजारो लोकांमधून आपण माझी निवड केली, हा मी माझा सन्मानच समजतो" आणि दादांची रवानगी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली. ऐन उमेदीच्या काळात १८ महिन्यांचा आगळा वेगळा प्रवास सुरू झाला होता. महाराष्ट्रातील ‘आर्थर’ जेलचाही अनुभव दादांना याच काळात आला. तुरुंगामध्ये अनेक विचारांचे, अनेक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. व्यक्तीस्वातंत्र्याचा आवळलेला फास मोकळा करण्यासाठी तुरुंगामध्ये व बाहेर जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तुरुंगामध्ये मोहन धारिया, दादा रत्नपारखी, बापुसाहेब काळदाते, अनंत भालेराव, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यासारख्या कार्यकर्त्यांसोबत रोज दादांचा संवाद घडत होता.
या १८ महिन्यांच्या कालावधीबद्दल दादा भरभरून बोलतात. मतपेटीतून जनतेने रोष व्यक्त केला आणि जनता दलाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले. दहशतीचा पराभव झाला होता. कार्यकर्त्यांना तुरुंगामध्ये डांबले. मात्र, विचारांना इंदिराजी डांबू शकल्या नव्हत्या. जनता या ‘मिसा’खाली अटक झालेल्या कार्यकत्यांची १८ महिन्यांपासून वाट बघत होती आणि तो दिवस उजाडला. तुरुंगातून सन्मानपूर्वक अटकेतील कार्यकर्त्यांची सुटका झाली होती. नाशिक सेंट्रल जेलच्या गेटवर भगिनी आपल्या या भावांना ओवाळण्यासाठी निरांजनाचे ताट घेऊन वाट बघत होत्या. घोषणांनी संपूर्ण परिसरामध्ये नवचैतन्य आले होते. ‘अंधेरे में एक प्रकाश... जयप्रकाश... जयप्रकाश...’
व्ही. टी. दादांनी तहसील कार्यालयात कॉपिंग क्लार्क म्हणून काही वर्ष सेवा केली. चांदवड येथील प्रसखाराम भागूजी आणि पलोड या फर्ममध्ये काम केले. १९५२ साली दुष्काळात तात्पुरत्या स्वरुपाचे काम केले. ‘बी अॅण्ड सी’मध्येही सेवा केली, त्र्यंबकला बदली झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला. फुलूशेट लोहाडे यांच्याबरोबर भागीदारीत बांधकाम व्यवसायात उडी घेतली. योगायोगाने गिरणाडॅमचा मोठा प्रोजेक्ट नांदगाव तालुक्यात सुरू झाला होता. दगड वाहतुकीचा ठेका दादांना मिळाला. डी. टी. तुसेंसारख्या प्रचंड मेहनत करणार्या लहान भावाची साथ त्यामुळे व्ही. टी. तुसे फर्म बांधकाम व्यवसायात नावारुपात आली होती. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडताना संघाचे काम मात्र दादांचे चालूच होते. संघाने दादांवर जी जबाबदारी दिली तिला न्याय देण्याचा दादांचा प्रयत्न चालूच होता. शहर कार्यवाह, जिल्हा कार्यवाह, जिल्हा संघचालक, विभाग संघचालक त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेची प्रांत कार्याध्यक्ष पदाची जबाबदारीही दादांनी समर्थपणे सांभाळली. कामाच्यानिमित्ताने प्रवास घडत होता. नवनवीन कार्यकर्त्यांशी संबंध येत होता. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, भाऊ गोविलकर, बाबा भिडे अशा महनीय व्यक्तींशी संपर्क येत होता. आजच्यासारखी दळणवळणाची साधने नसताना खेडोपाडी कार्यकर्त्यांशी भेटी घेण्यासाठी केलेल्या प्रवासाच्या आठवणी दादांच्या आजही स्मरणात आहे. माणूस प्रवासाने शहाणा होतो हेही दादा आवर्जून सांगतात. महाराष्ट्रातील अनेक लहान कार्यकर्त्यांची एकदाच घेतलेली भेट त्याच्या नाव-गावासह दादांच्या आजही लक्षात आहे, याचेच आश्चर्य वाटते.
अशा या विचारांशी प्रामाणिक असणार्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा एकसष्टीचा कार्यक्रम नांदगावकरांनी २७ मार्च, १९८८ रोजी साजरा केला. या नागरी सत्कारास गिरीश कुबेर, भैय्याजी जोशी, डॉ. मधुकरराव आचार्य, प्रल्हाद अभ्यंकर, नानासाहेब पुणतांबेकर, भाऊसाहेब गोविलकर, अण्णासाहेब कवडे, भिकूसेठ दुधावट, माणिकराव पाटील, दौलतराव कवडे यासारख्या अनेक राजकीय, सामाजिक, विविध संघटना, विविध विचारांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती म्हणजे दादांच्या कार्याची पावतीच होती.
सामाजिक क्षेत्रात वावरताना अजातशत्रू असणार्या दादांना नांदगावमधील एक मस्त माणूस म्हणून ओळखले जाणारे अमरचंद सेठी यासारख्या समाजवादी कार्यकर्त्याचा नगरपालिकेच्या निवडणुकीत केलेला पराभवही नांदगावकरांना लक्षात राहिला. मुस्लीम बांधवांनीही अमरचंद सेठी यांच्या प्रचाराला निहाल अहमद यांच्यासारखा नेता येऊनही मलाच मते दिली, हे दादा अभिमानाने सांगतात. संघकार्यासाठी तर दादांनी वाहून घेतलेले होतेच. परंतु, अनेक सामाजिक विषयावर पुढाकार घेऊन हुंडा प्रथेविरुद्ध स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी व नातवाच्या लग्नाच्यावेळी समाजात आदर्श घालून दिला आहे. हिंदू पंच असताना देवी मंदिराचा जीर्णोद्धारअसेल किंवा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेत केलेले कार्य लक्षात राहण्यासारखेच आहे.
- भैय्यासाहेब चव्हाण