नागरिकत्व व राष्ट्रीयत्व; काय सांगतो इस्लाम?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
Alla _1  H x W:


सध्या आपल्या देशात 'नागरिकत्व सुधारणा कायदा', 'राष्ट्रीय नागरिकत्व सूची' या विषयांवरून मोठे वादळ उठलेले आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांतून धार्मिक छळामुळे स्थलांतरित होऊन आपल्या देशात आश्रय घेतलेल्या व घेणार्‍या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ख्रिश्चन लोकांना नागरिकत्व देण्याच्या प्रश्नावरून, 'यांत मुस्लिमांवर अन्याय होत आहे,' 'धार्मिक आधारावर नागरिकत्व देणे,' 'घटनेतील समानतेच्या तत्त्वाशी विसंगत आहे. त्यामुळे हा कायदा घटनाविरोधी आहे,' अशा स्वरूपाची टीका होत आहे. या संबंधी विचार करताना एकूणच राष्ट्रवाद या विषयासंबंधी 'इस्लाम'चे म्हणणे काय आहे, ते बघावे लागेल, असे लक्षात आले.

 

डॉक्टर अली मोहम्मद नक्वी हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात प्राध्यापक असून, इस्लाम विषयक अभ्यास, संशोधन यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आहेत. त्यांची सुमारे २८ प्रकाशित पुस्तके पर्शियन, इंग्रजी, अरेबिक व इतर भाषांतील असून, त्यातील अनेकांचे इतर परदेशी भाषांतूनही भाषांतर झालेले आहे. त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे उपकुलगुरूपद भूषवले असून, अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिसंवाद, यात भाग घेऊन शोधनिबंध सादर केलेले आहेत. या लेखातील मांडणी ही मुख्यतः त्यांच्या इस्लाम आणि राष्ट्रवाद या पुस्तकावर आधारित आहे. याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.

 

या ग्रंथातील भाग सात 'इस्लाम आणि राष्ट्रवाद' याच्या शीर्षकांतच ते म्हणतात,“'इस्लाम' आणि 'राष्ट्रवाद' हे दोन विरुद्ध ध्रुव (Opposite Poles) आहेत!” 'राष्ट्रवाद' ही एक सामाजिक-राजकीय विचार प्रणाली आणि जीवनपद्धती आहे, जी व्यक्तीचे व्यक्तिगत व सामाजिक जीवन पूर्णतः प्रभावित करते. इस्लाम हीसुद्धा एक अशीच स्वतंत्र, सर्वंकष, आध्यात्मिक, व्यावहारिक, राजकीय आणि सामाजिक विचारप्रणाली आहे, जिच्यात काही विशिष्ट श्रद्धा समाविष्ट आहेत. त्यामुळे तिचा 'राष्ट्रवादा'शी संघर्ष आणि विरोध येणे अगदी अटळ आहे. मुस्लीम व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित कोणत्याही गोष्टीबाबत इस्लामिक आदर्शवाद हा इतर कुठल्याही विचारधारेशी पूर्ण विसंगत / विरोधी आहे. थोडक्यात सांगायचे, तर एक मुस्लीम व्यक्ती, ही एकाच वेळी 'अनेकेश्वरवादी मुस्लीम' किंवा 'साम्यवादी मुस्लीम' असूच शकत नाही. इस्लाममध्ये राष्ट्रवादाला जराही थारा नाही, तिथे स्वत्वाचा प्रश्न येतो आणि दोन्ही पूर्णतः परस्पर विरोधी आहेत.

 

(In Islam, there is no room for one to be a loyal and genuine nationalist. It is a question of identity, and one negates the other.)

 

इस्लामिक एकतेचा पाया, हा केवळ समान श्रद्धा आणि सद्गुण हाच असून तिथे वंश, देश, भाषा किंवा संस्कृती यांना स्थान नाही. राष्ट्रवादाचे ध्येय राष्ट्रनिर्मिती हे असते, तर इस्लामचे ध्येय वैश्विक एकात्मता हे असते. राष्ट्रवादात पितृभूमीशी आपुलकी, निष्ठा महत्त्वाची असते, तर इस्लाममध्ये देव (अल्लाह) आणि धर्माशी एकनिष्ठ असणे महत्त्वाचे असते. राष्ट्रवादात भौगोलिक सीमांना आणि वंशभेदांना महत्त्व असते, तर इस्लाम त्यांना नाकारतो. राष्ट्र्वादात ऐतिहासिक परंपरा, संस्कृती, चालीरीती, आणि राष्ट्रातील ऐतिहासिक महापुरुष महत्त्वाचे असतात, तर इस्लामची दृष्टी-भौगोलिक सीमा, वंश, देश, या सर्वांच्या पलीकडे जाते. इस्लाम सांगतो, की मोझेस, जीझस, मोहम्मद आणि अली हे संपूर्ण मानव जातीचे आहेत. जगातील सर्व देशांनी कुराण हा त्यांचा ग्रंथ मानावा, काबाला पवित्र मानावे आणि इस्लामच्या नेत्यांना त्यांचे नेते मानावे, अशी इस्लामची अपेक्षा आहे.

 

इस्लाम सांगतो की, जगातले सर्व मुस्लीम हे एक आहेत आणि सर्व मुस्लीम राष्ट्रे मग ती अरब, गैर-अरब, तुर्क, अफगाण, भारतीय, कृष्णवर्णी, श्वेतवर्णी, पीतवर्णी, कोणीही असोत, एकाच समान श्रद्धेच्या पायावर एकच समाज (उम्मा) असावेत/आहेत. अर्थात, राष्ट्रवाद्यांना-धर्माच्या पायावर आधारित असे हे अनेक राष्ट्रांचे ऐक्य हा राष्ट्रवादासाठी, राष्ट्राच्या अस्मितेसाठी धोका वाटतो. अशा तर्‍हेने राष्ट्रवाद आणि इस्लाम यांचे सामाजिक व राजकीय दृष्टिकोन पूर्णतः वेगळे असल्याने ते एकत्र नांदू शकत नाहीत. अनेकेश्वरवाद किंवा निरीश्वरवाद यांच्या खालोखाल इस्लामला असलेला मोठा धोका कुठला असेल, तर तो देश, वंश, वर्ण, संस्कृती यांवर आधारित राष्ट्रवाद हाच होय. 'राष्ट्रवाद' आणि 'इस्लाम' यांच्यात असलेले हे वैर नवीन नाही. ते इस्लामच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच आहे. आपण मुस्लीम तेव्हाच असतो, जेव्हा जीवनाच्या सर्व अंगांचा विचार आपण इस्लामिक दृष्टीने करतो. जर आपण सामाजिक व राजकीय बाबतीत वेगळा (गैर इस्लामिक) दृष्टिकोन स्वीकारला. अर्थात, आपण इस्लामचा काही भाग नाकारला, तर आपण स्वतःला मुस्लीम कसे म्हणवू शकतो?

 

कोणतीही इस्लामेतर विचारधारा अंगीकारून कोणी स्वतःला मुस्लीम म्हणवू शकत नाही. राष्ट्रवादी मुस्लीम ही संकल्पना तितकीच विचित्र, असंभवनीय आहे, जितकी-भांडवलवादी मार्क्सिस्ट किंवा धार्मिक साम्यवादी/कम्युनिस्ट! या संकल्पना परस्परविरोधी आहेत. जेव्हा इस्लामी आदर्शवाद बळावतो, तेव्हा राष्ट्रवाद मृतप्राय होतो आणि जेव्हा राष्ट्रवाद बळावतो, तेव्हा इस्लाम नष्टप्राय होतो. एकाचवेळी दोन विरुद्ध दिशेने जाणार्‍या नावांमध्ये पाय ठेवणे कुणालाच शक्य नाही. जर कोणी तसा दावा करीत असेल, तर ते एक तर अज्ञान असेल, किंवा ढोंग. थोर इस्लामी अभ्यासक इक्बाल यांनी भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय नेते मौलाना हुसेन अहमद यांना उद्देशून रचलेल्या एका काव्यात असे म्हटले आहे की, 'जे देश आणि राष्ट्र यांना एकतेचा पाया मानतात. त्यांना प्रेषिताने (मोहम्मदाने) दिलेली 'इस्लामची खरी शिकवण' समजलेलीच नाही! त्यामुळे आपण राष्ट्रवादाचा आणि इतरही गैर इस्लामिक विचारधारांचा पूर्णपणे त्याग करून इस्लामकडे वळणे जरुरीचे आहे. जर कोणी तसे न करता दोहोंची सरमिसळ करेल, तर वस्तुतः त्याने इस्लामशी फारकत घेतली, व तो इस्लामविरोधी बनला, असाच त्याचा अर्थ होईल. इस्लाम हे एक असे सर्वव्यापी तत्त्व आहे की, जे तुम्ही एक तर पूर्णतः स्वीकारता किंवा पूर्णतः नाकारता. थोडेसे हे आणि थोडेसे ते, असला अर्धवटपणा यात चालत नाही.'

 

पुढे राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर कुराणाच्या आधारे भाष्य करताना ते म्हणतात, 'राष्ट्रवाद हा अखिल मानवजातीचा विचार कधीच करीत नाही. उलट इस्लाम हा अखिल मानवजातीकडे एकात्म दृष्टीने बघतो. इस्लामचे अंतिम उद्दिष्ट हे एकेश्वरवादी वैश्विक समाज निर्मितीचे आहे. एक असा समाज, जो भौगोलिक, वांशिक, भाषिक व सांस्कृतिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन समान श्रद्धांच्या पायावर एकात्म असेल.'

 

मानवजातीची राजकीय, राष्ट्रीय आधारावर विभागणी करणे हा कुराणाच्या दृष्टीने भयंकर गुन्हा असून त्याचा परिणाम म्हणून माणसाला दैन्य आणि दैवी प्रकोप भोगावे लागतात. कुराणामध्ये एकही ओळ अशी नाही, जी राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेला किंवा देश आणि वंश यांच्या आधारे मनुष्यजातीच्या विभागणीला दुजोरा देईल. प्रेषिताने नेहमीच अखिल मानवजातीच्या एकात्म समाज (उम्मा) निर्मितीचे लक्ष्य ठेवले. प्रादेशिक किंवा वांशिक अस्मितांना, श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना गौण ठरवले. कुराणाच्या आदेशानुसार इस्लामचे कार्य राष्ट्रीय नसून वैश्विक पातळीवरचे आहे. जगभरातल्या श्रद्धाळू लोकांनी एकाच ध्वजाखाली एकत्र येणे इस्लामला अभिप्रेत आहे. कुराणाची शिकवण वैश्विक असून सर्व मानवजातीसाठी आहे, असे मानले जाते. अशा तर्‍हेने इस्लामची ध्येये, जीवनदृष्टी, आणि शिकवण ही सर्व राष्ट्रवादाच्या सर्वस्वी विरोधी आहेत. राष्ट्रवादाच्या दृष्टीने निष्ठा ही प्रथम (स्वतःच्या) देशाशी हवी, तर इस्लामच्या दृष्टीने ती केवळ अल्लाहशीच हवी.

 

आत्यंतिक देशप्रेम हा राष्ट्रवादाचा पाया, तर इस्लाममध्ये अल्लाहविषयी अतूट श्रद्धा आणि इमान हाच पाया. राष्ट्र्वादात प्रेम आणि निष्ठा ही सर्वस्वी देशाच्या पायी वाहिलेली असते, आणि वेळप्रसंगी देवावरील निष्ठेला दुय्यम स्थान मिळते. हे कुराणाला कधीही मान्य होणारे नाही. कारण, ते पाखंड, पाप आहे. देशाला, राष्ट्राला देवाहून अधिक महत्त्व देणे, हे इस्लामला मंजूर नाही.

 

राष्ट्र्वादात देशाच्या भौगोलिक सीमांशी बांधिलकी, निष्ठा अभिप्रेत आहे, तर इस्लाममध्ये निष्ठा ज्याने भूमी निर्माण केली, त्या अल्लाहवर आहे. इस्लामनुसार संपूर्ण जगावर मालकी केवळ अल्लाहचीच आहे आणि जे त्याच्यावर श्रद्धा, निष्ठा ठेवतात. त्यांचा अल्लाहच्या भूप्रदेशावर, त्याच्या नियंत्रणावर अधिक हक्क आहे. कुराणात यावर भर दिलेला आहे आणि हे सांगणार्‍या कित्येक ओळी आहेत की, कुठल्याही देशाचा कोणत्याही विशिष्ट भूप्रदेशावर हक्क नसून, सगळी भूमी केवळ अल्लाहचीच आहे. इस्लामच्या या व्यापक दृष्टिकोनामुळे सच्च्या मुस्लिमाची बांधिलकी कोणत्याही भौगोलिक सीमांशी, राष्ट्राशी राहत नाही. तो संपूर्ण जग अल्लाह आणि त्याच्या एकनिष्ठ सेवकांचेच असल्याचे मानतो. प्रसिद्ध इस्लामिक विचारवंत इक्बाल म्हणतो, सगळी भूमी ही अल्लाहचीच. त्यामुळे ती आमचीच! कुराण नेहमी अखिल जगताचाच विचार करते, कुणा एका राष्ट्राचा नव्हे. त्यामुळे 'जन्मस्थानावरून नागरिकत्व ठरते' ही कल्पनाच इस्लामला मान्य नाही. त्याऐवजी ते श्रद्धेवरून ठरते, असे इस्लाम मानतो आणि इथे राष्ट्रवादाचा पायाच उखडला जातो.


Alla _1  H x W:

 

इथपर्यंतचे सर्व विवेचन डॉ. अली मोहम्मद नक्वी यांच्या ग्रंथाच्या आधारे झाले. आता दुसरे एक इस्लामी विचारवंत सय्यद कुत्ब यांचा खालील उतारा पाहू -

 

'जिथे अल्लाहच्या शरियतचा पूर्ण अंमल चालतो आणि जिथे अल्लाहशी असलेल्या संबंधांच्या पायावरच सर्व मानवी संबंध आधारलेले असतात, असा जेवढा जगाचा भाग, तेवढा सोडून इतरत्र कोणताही भाग हा कुणा मुस्लीमाचा देश असूच शकत नाही. मुस्लिमाची अल्लाहवरील श्रद्धा, हीच त्याची राष्ट्रीयता, जी त्याला एकात्म मुस्लीम समाजाचा 'दार-उल-इस्लाम'चा घटक बनवते. एकमेव अल्लाहवर ज्यांचा अतूट विश्वास नाही, असा कोणीही मुस्लिमाचा नातेसंबंधी असू शकत नाही.' अशा तर्‍हेने, अल्लाहवरील समान विश्वासाच्या माध्यमातून त्याचे (मुस्लिमाचे) इतर श्रद्धाळूंशी संबंध जुळतात. मुस्लिमाचे आपल्या आई, वडील, भाऊ, पती-पत्नी किंवा इतर नातेसंबंधी यांच्याशी संबंध हे केवळ त्यांच्या अल्लाहशी असलेल्या संबंधांतूनच उद्भवतात. म्हणजे, अल्लाहशी संबंध प्रथम, नातेसंबंध मागाहून.

 

एखाद्या मुस्लिमाचे राष्ट्रीयत्व, ज्याने तो ओळखला जातो, ते एखाद्या देशाच्या शासनाने ठरवलेले नसते ज्या कुटुंबात तो राहतो, जिथे त्याला सुखशांती मिळते, ते कुटुंब रक्ताच्या नात्यांनी बांधलेले नसते. तो ध्वज, ज्याच्या सन्मानासाठी मुस्लीम हौतात्म्य पत्करतो, तो कुणा राष्ट्राचा ध्वज नसतो आणि ज्या विजयाचा उत्सव मुस्लीम साजरा करतो, तो कुणा देशाच्या लष्कराचा विजय नसतो. इथे 'राष्ट्रीयता' ही केवळ धर्मश्रद्धाच असू शकते. पितृभूमी ही 'दार-उल-इस्लाम' असते. शासक/राज्यकर्ता हा केवळ अल्लाह असू शकतो आणि 'राज्यघटने'ची जागा केवळ 'कुराण'च घेऊ शकते. पितृभूमी, राष्ट्रीयत्व आणि नातेसंबंध यांच्याविषयी या संकल्पना प्रत्येकाने विशेषतः धर्मप्रसारकांनी आपल्या अंतःकरणात स्वच्छ कोरून ठेवल्या पाहिजेत.
 

हे झाले इस्लामचे 'राष्ट्र','राष्ट्रीयता', 'राष्ट्रवाद' यासंबंधी विचार. आता आपल्या देशाच्या राज्य घटनेकडे अगदी ओझरती नजर टाकली, तरीही या संकल्पनांना किती महत्त्वाचे स्थान आहे, ते कळेल. राज्य घटनेच्या उद्देशिकेतच (Preamble) राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच 'अनुच्छेद५१()' मूलभूत कर्तव्ये यामध्ये - राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्तिदायक उदात्त आदर्शांची जोपासना अनुसरण करणे, भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता यांचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे, राष्ट्रीय सेवा बजावणे, संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, राष्ट्र सतत सर्व क्षेत्रांत चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे निरंतर प्रयत्न करणे, असे अनेक उल्लेख आहेत. अर्थात, घटनेला अभिप्रेत असलेली राष्ट्रीयता आणि इस्लामचे त्याविषयीचे विचार यांतील विरोध अगदी स्पष्ट आहे.

 

यावर अधिक काही भाष्य करण्याची गरजच नाही! पण एवढे जरूर म्हणावेसे वाटते की, आज जे लोक समानता, मानवता, विश्वबंधुता इत्यादी आधारांवर शेजारी राष्ट्रातून येणार्या मुस्लीम शरणार्थींनाही नागरिकत्व द्यावे, अशी मागणी करीत आहेत. त्यांनी इस्लाम आणि राष्ट्रवाद यासंबंधी तज्ज्ञांचे विचार निदान एकदा तरी नजरेखालून घालावेत. त्यांना इस्लामिक विचार आणि राज्यघटनेत अभिप्रेत असलेले राष्ट्रीयत्व यांतील अंतर्विरोध निश्चितच लक्षात येईल. केवळ विरोधासाठी विरोध करता राष्ट्रहिताचा विचार व्हावा, एवढीच अपेक्षा.
 

- श्रीकांत पटवर्धन

9892713984

@@AUTHORINFO_V1@@