रजनीकांत यांच्याकडून अलीकडे जे वक्तव्य केले गेले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ होऊनही, आपल्या म्हणण्यावर ते ठाम राहिल्याने ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. दुसरी व्यक्ती आहे, ‘देशाचे तुकडे झाले पाहिजेत,’ अशी मनीषा बाळगून काम करीत असलेल्या टोळक्याचा सदस्य शरजील इमाम.
लेखाचे शीर्षक पाहून, या दोघांचा काय संबंध अशी शंका येणे स्वाभाविक आहे. दोघांचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पण, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या नावांची वेगवेगळ्या संदर्भात चर्चा होत आहे. रजनीकांत यांच्याकडून अलीकडे जे वक्तव्य केले गेले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ होऊनही, आपल्या म्हणण्यावर ते ठाम राहिल्याने ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. दुसरी व्यक्ती आहे, ‘देशाचे तुकडे झाले पाहिजेत,’ अशी मनीषा बाळगून काम करीत असलेल्या टोळक्याचा सदस्य शरजील इमाम. दिल्लीमध्ये शाहीन बाग येथे गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध जी भाडोत्री निदर्शने केली जात आहेत, त्याचा हा सूत्रधार. या शरजील इमामाने जे तारे तोडले आहेत, ते पाहता त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचाच गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यानुसार विविध राज्यांमध्ये तसे गुन्हे दाखल झालेही आहेत. प्रारंभी रजनीकांत यांच्या बाबतीत जे घडले ते पाहू.
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे लाखो चाहते आहेत. रजनीकांत राजकारणामध्ये येणार असल्याची चर्चाही अनेक दिवसांपासून गाजत आहे. दक्षिण भारतातील राजकारणावर चित्रपटसृष्टीचा मोठा प्रभाव असल्याचे कित्येक वर्षांपासून आपण अनुभवत आहोतच. रजनीकांत राजकारणात आले तर त्याचा राजकारणावर प्रभाव पडेल, हे उघडच आहे. तर, रजनीकांत यांना ‘तुघलक’ या सुप्रसिद्ध तामिळी साप्ताहिकाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. चो रामस्वामी यांनी नावारूपास आणलेल्या या साप्ताहिकाचे सध्याचे संपादक आहेत प्रसिद्ध विचारवंत एस. गुरुमूर्ती. ‘तुघलक’ च्या कार्यक्रमामध्ये बोलताना, रजनीकांत यांनी, १९७१ साली घडलेल्या एका घटनेचे वृत्त या साप्ताहिकाने कसे निर्भीडपणे दिले होते त्याचा उल्लेख केला होता. सालेम या शहरात एका मिरवणुकीमध्ये हिंदू देवदेवतांची जी विटंबना करण्यात आल्याच्या संदर्भातील ती घटना होती. द्राविडी चळवळीचे नेते पेरियार रामस्वामी नायकर यांच्या चिथावणीने निघालेल्या त्या मिरवणुकीत प्रभू रामचंद्रांच्या गळ्यात चपलांची माळ घालण्यात आली होती. तसेच अन्य देवदेवतांची विटंबना करणाऱ्या चित्रांचाही त्यामध्ये समावेश होता. ‘तुघलक’ ने हे वृत्त प्रसिद्ध केले होते, हे रजनीकांत यांनी त्या कार्यक्रमामध्ये लक्षात आणून दिले. झाले...! त्यावरून तामिळनाडूमध्ये एकच गदारोळ उडाला. द्रमुक, अण्णाद्रमुक आणि पेरियार रामस्वामी नायकर यांच्या विचारातून निर्माण झालेल्या संघटनांनी रजनीकांत यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. त्यांना धमक्या देण्यात आल्या. कोर्टात खेचण्याची भाषा केली गेली. पण, रजनीकांत यांनी त्या कशालाच भीक घातली नाही आणि आपण जे काही बोललो, त्याच्यावर ठाम असल्याचे स्पष्ट करून, आपण मुळीच माफी मागणार नाही, हे त्यांनी सांगितले. आपले म्हणणे खरे असल्याचे सांगतानाच, १९७१ साली त्याबाबत जे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याच्या छायाप्रतीही त्यांनी माध्यमांना दाखविल्या. “रजनीकांत यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता,” असा सल्ला त्यांना द्रमुक नेते एम. के. स्टालिन यांनी दिला. त्यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचे इशारे देण्यात आले. राज्यात निदर्शनेही झाली, पण रजनीकांत आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले.
हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यामध्ये द्रमुक नेत्यांसह रामस्वामी नायकर यांचे अनेक अनुयायी सहभागी असल्याच्या घटना त्या राज्यात सातत्याने घडत असतात. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आदी देवतांचा अपमान करणे, हिंदू संस्कृतीची खिल्ली उडविणे यामध्ये पेरियार यांच्या अनेक अनुयायांना अभिमान वाटतो. या संदर्भात अलीकडेच एस. गुरुमूर्ती यांनी समाजमाध्यमांवर केलेले वक्तव्य खूपच बोलके आहे. ते म्हणतात की, “पेरियार यांनी रामास चपलांनी मारल्यामुळे, ज्या द्रमुकला १९६७च्या निवडणुकीत १३८ जागा मिळाल्या होत्या, त्या द्रमुकला १९७१च्या निवडणुकीत १८३ जागा मिळाल्या, असे द्रमुक नेते के. वीरमणी मोठ्या अभिमानाने म्हणत असत. पण, आता तेच, जमावामधून कोणी तरी रामाच्या दिशेने चप्पल फेकली, असे म्हणत आहेत. १९७१ पासून तामिळनाडूमधील राजकारण कसे बदलत गेले हेच त्यावरून दिसून येत आहे,” असे गुरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
रजनीकांत यांनी जे घडले, ते सत्य असल्याचे सांगतानाच, आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचे जे वक्तव्य केले, त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. रजनीकांत यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ते संघ आणि भाजपच्या जवळ जात असल्याचे आरोप करण्यात आले. विरोधकांना तशी सवयच जडली आहे म्हणा ना! पण, रजनीकांत यांनी १९७१च्या घटनेसंदर्भातील वक्तव्यावर ठाम राहण्याची जी सडेतोड भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
दिल्लीतील शाहीन बाग सध्या गाजत आहे. त्या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करण्यासाठी जी निदर्शने होत आहेत, त्यामध्ये ‘जिना की आझादी’ अशा घोषणा दिल्या जात होत्याच. त्यामध्ये आता त्या निदर्शनाचा सूत्रधार असलेल्या शरजील इमाम याने आणखी तेल ओतले आहे. जेएनयुमध्ये शिकत असणार्या् या तरुणाने, देशाचा आसामशी असलेला संबंध कसा तोडून टाकणे शक्य आहे, त्याची योजनाच जाहीर केली! ईशान्य भारतास जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ नावाचा जो २२ किमीचा चिंचोळा भूप्रदेश आहे, त्यावर ताबा मिळविला की आसाम देशापासून तोडणे सहज शक्य आहे, असे या महाभागाने म्हटले आहे. ‘चिकन नेक’ या नावाने ओळखला जाणारा हा भूप्रदेश नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान असून तो देशाच्या संरक्षणाचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा आहे. चार-पाच लाख मुस्लिमांनी त्या भागावर कब्जा घेतला की, आसाम आणि ईशान्य भारतात आपण हवे ते घडवू शकू, असे तारे या देशद्रोही इमामाने तोडले आहेत. आता या शरजील इमाम याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपांखाली गुन्हे नोंदविण्यात आल्याने आपले काळे तोंड लपविण्यासाठी तो एका राज्यातून दुसरीकडे पळापळ करीत आहे.
या देशात राहणारे काही नतद्रष्ट देशाशी इमान न राखता फुटीरतेची भाषा कशी बोलत आहेत, ते यावरून लक्षात येते. सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आणल्यानंतर असे अनेक ढोंगी मुखवटे गळून पडू लागले असून त्यांचे भीषण चेहरे पुढे येऊ लागले आहेत. अशा व्यक्ती ‘मोजुनी माराव्या पैजारा’ यापेक्षा भयंकर गुन्हे करीत आहेत. देशाचे ऐक्य बाधित कसे होईल, असा जो प्रयत्न देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालल्याचे दिसत आहे, त्या व्यापक मोहिमेचा हा भाग असल्याचे दिसते. अशा राष्ट्रविरोधी शक्तींचे मनसुबे उधळून लावायला हवेत. अशा देशद्रोही शक्तींना खड्यांसारखे बाजूला टाकायलाच हवे!