बिजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबता थांबेनासा झाला आहे. चीन प्रशासनाने खबरदारी म्हणून विषाणूंचे सर्वात मोठे प्रभाव क्षेत्र असलेल्या वुहान आणि इझोऊ येथील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही शहरांतून जाणाऱ्या बस, रेल्वे आणि विमान सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय क्षेत्राला हादरवणार्या एका 'सिव्हियर एक्सूट रेस्पिटरी सिंड्रोम' (सार्स) अशा 'कोरोना' विषाणूच्या बाधेवर सध्या जागतिक आरोग्य संघटनांपासून ते सर्वच राष्ट्रांच्या आरोग्य मंत्रालयांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये या विषाणूने बळी घेतलेल्यांची संख्या १९वर पोहोचली असून या प्रकारामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला.
'कोरोना व्हायरस' हा अनेक वैद्यकीय तज्ज्ञांची डोकेदुखी ठरू लागला आहे. कारण, २१ दिवसांत हा विषाणू दक्षिण कोरियापर्यंत पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या वक्तव्यानुसार आत्तापर्यंत 'कोरोना' व्हायरसपैकी सहा विषाणू अतिधोकादायक होते. २००२ मध्ये 'सार्स'मुळे १ हजार, ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा या विषाणूचे संक्रमित रुग्ण दिसू लागल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. हा विषाणू प्राण्यांच्या शरीरातून माणसांमध्ये संक्रमित झाला, त्यानंतर हा विषाणू फार मोठ्या वेगाने पसरू लागला, असा दावा करण्यात आला.
गेल्या महिन्यात ३१ डिसेंबर, २०१९ रोजी पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे येथील सीफूड मार्केट बंद करण्यात आले होते. हा विषाणू याच भागातून जगभर पसरत गेला, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. ७ जानेवारीला 'कोरोना व्हायरस'ची वैद्यकीय अधिकार्यांनी याची पुष्टी केली. १२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार, हा व्हायरस मनुष्यामार्फत संक्रमित होऊ शकत नाही. १३ जानेवारी रोजी थायलंडमध्ये या आजाराची लागण झालेला रुग्ण आढळला.
१६ जानेवारी रोजी जपानमध्ये बाधित रुग्णाची नोंद झाली. २० जानेवारीला चीनमध्ये तिसर्या मृत्यूची नोंद झाली, तर दक्षिण कोरियामध्ये एक रुग्ण आढळला. या आजारावर उपचार शोधून काढण्यासाठी चीनमध्ये डॉक्टरांचे पथक दिवसरात्र काम करत होते. मात्र, या आजाराची लस शोधून काढणे त्यांनाही जमले नाही, परिणामी गंभीर रुग्ण दगावले.
चीन-हाँगकाँगमध्ये २००२ साली ८ हजार रुग्ण या विषाणूमुळे बाधित झाले होते. त्यातील १ हजार, ४२५ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळेच जगभरातील देशांनी या विषाणूचा धसका घेतला आहे. चीन सरकारनेही या विषाणूवर नियंत्रण शक्य नसल्याचे मान्य केले आहे. या विषाणूबद्दल चिंतेचे कारण हेच की, यामुळे सर्दी-पडसे यांसारख्या लक्षणांपासून रुग्णाची लक्षणे वेगळी दिसत आहेत, असे मत एडिनबर्ग विद्यापीठाचे प्रा. मार्क वुलहाऊस यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये हाहाःकार माजवलेल्या विषाणूंमध्ये इबोला, झिका, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, निपाह आदींचा समावेश होता. मात्र, या नव्या विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. मुख्यत्वे प्राण्यांच्या माध्यमातूनच मानवाच्या शरीरात हा प्रवेश करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मांजरींद्वारे हा विषाणू पसरल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.
मात्र, याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. आजारी रुग्णावर उपचार करणार्यांना, देखभाल करणार्यांनाही अशीच बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. चीनमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये हा विषाणू पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतातही आता या परिस्थितीसंदर्भात 'अलर्ट' जारी करण्यात आला. विमानतळावर परतणार्या प्रवाशांची थर्मल चाचणी सुरू करण्यात आली आहे. अद्याप एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही. तसेच चीनमध्ये जाणार्या प्रवाशांची यादीही आरोग्य मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाकडून मागवून घेतली आहे. या प्रवाशांशी संपर्क करून त्यांना समुपदेशनही केले जाणार आहे. अनेक ठिकाणी यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे तूर्त खबरदारी घेण्याशिवाय अन्य कुठलाच पर्याय उपलब्ध नाही.
शांघाई येथील डिस्ने रिसॉर्ट हे २५ जानेवारीपासून काही काळासाठी बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये झपाटयाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूपासून प्रतिबंध म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.