पवार, आव्हाड व्हाया अशोक चव्हाण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


जनतेने राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसलाही कधीचेच लाथाडले आहे. तरीही ते सुधारताना दिसत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्यावर जनादेशाशी विश्वासघात करून लबाडीने सत्ता मिळवण्याची वेळ येते. पण, या विश्वासघाताची शिक्षा त्यांना आज ना उद्या भोगावीच लागेल, तेव्हा आता ज्यांच्यापुढे ते कुर्निसात करतात, त्या मुस्लीम मतदारांचा काहीही उपयोग होणार नाही.


मुस्लिमांमुळे महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन : शरद पवार.

 

हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले हे सांगू शकत नाही, मुस्लीम मात्र सांगू शकतात, कारण त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे : जितेंद्र आव्हाड.

 

मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेबरोबर सरकारमध्ये : अशोक चव्हाण.

 

आणि, देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचाच : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विद्यमान सरकारमधील त्या पक्षाचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसनेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सर्वांचीच वरील वक्तव्ये पाहिली की, मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, ते दिसून येते. तथापि, आपल्या विधानांतून राष्ट्रवादी काँग्रेस असो वा काँग्रेस नेते दोघांनाही हिंदू धर्मीय आमच्यासाठी कसे कस्पटासमान आहेत, हेही दाखवून द्यायचे असते. पहिला मुद्दा शरद पवारांचा. वस्तुतः महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालेले नाही, ना राज्यातल्या मतदारांनी तसा जनादेश दिला. हो, सत्ता बळकावण्याचे काम मात्र नक्कीच झालेले. तमाम मराठीजनांची इच्छा राज्याच्या गादीवर एकाचवेळी हिंदुत्व आणि विकासाचा पुरस्कार करणारे सरकार यावे, अशीच होती. परंतु, सत्तेसाठी वखवखलेल्या शिवसेनेने भगवी शाल उतरवून हिरवा चोळणा घातला आणि शरद पवारांशी पाट लावला. राज्यातल्या लाखो मतदारांच्या भावना पायदळी तुडवून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावत मुख्यमंत्र्यांची खुर्ची हस्तगत केली. परंतु, ही जशी मतदारांशी बेईमानी होती, तशीच आपल्या विचार, तत्त्व आणि मतांशीही होतीच. अर्थात सत्तेचे सोनेरी ताट समोर असले की, शिवसेनेसारख्या पक्षाने निलाजरेपणे ते ओरबाडून घेणे साहजिकच. कारण तसे न केले तर पक्ष चालणार कसा?

 

दरम्यान, राज्यात गेल्यावर्षी झालेल्या मतदानानंतर भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या, तसेच मतांची टक्केवारीही भाजपचीच सर्वाधिक २५ टक्के इतकी होती. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागा ५४ आणि मतांची टक्केवारी १६ इतकी होती. पण पवारांच्या विधानाचा अर्थ मुस्लिमांनी भाजपला नाकारून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले आणि त्याच्या परिणामी भाजपची सत्ता गेली असाही होतो, जो सपशेल खोटा आहे. कारण आकडेवारीची गणिते केली तरी ते स्पष्ट दिसते. परंतु, शरद पवारांचे गणित निराळेच असते, त्यांना ही टक्केवारी आणि जिंकलेल्या-गमावलेल्या जागा दिसत नाहीत. त्यांना दिसते फक्त मुस्लिमांना आंजारणे-गोंजारणे. पवारांचे आताचे विधान त्यातूनच आलेले असून मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठीची ही साखरपेरणीच आहे. तसेच मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही करायचे नाही, केवळ अशी वक्तव्ये करून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचे आणि आपले सत्ताप्राप्तीचे ईप्सित साध्य करायचे, असा त्यांचा नेहमीचा कावाही यामागे आहेच. परंतु, हे औटघटकेचे राज्य जितके दिवस चालेल, तितके दिवस पवारांनी हिंदूंना झिडकारून मुस्लिमांना धन्यवाद नक्कीच द्यावेत, नंतर मात्र, त्यांची गाठ राज्यातल्या हिंदूंसह सर्वधर्मीयांशी असेल आणि तेव्हा त्यांना त्याची किंमतही चुकती करावीच लागेल.

 

पवार मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत असतानाच जितेंद्र आव्हाडांनाही मुस्लिमांच्या कबरीवर कलमा पढावासा, माथा टेकवावासा वाटला. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधावेळी मुस्लिमांना खुश करण्यासाठी तुम्ही इथल्या मातीत सामावले असल्याचे त्यांच्या दफनविधीच्या पद्धतीवरून जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. आव्हाडांनी आपल्या विधानांतून मुस्लीम वगळता ज्यांच्यात दफनविधी होत नाही, त्या सर्वच धर्मीयांचा अपमान केला आहे. पण, स्वतःच्या नावापुढे ‘डॉक्टर’ लावणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा बिनडोकपणाही यातून समजतो. मुस्लिमांचे मरणोत्तर अवशेष केवळ विशिष्ट ठिकाणच्या जमिनीत तीन फूट खाली असतील तर हिंदूंच्या पूर्वजांचे अवशेष इथल्या कणाकणात आहेत. कारण, दहनविधीनंतर इथल्या हवेत जसा हिंदू शिल्लक उरतो, तसाच तो अस्थी विसर्जनानंतर नदीच्या पाण्यातही विचरण करतोच. त्या पाण्यावर कुठल्या ना कुठल्या ठिकाणची जमीन ओलिताखाली येऊन अन्नधान्य पिकतेच. हिंदूंच्या व्यापकतेचा याहून निराळा पुरावा तो कोणता असेल? परंतु, जितेंद्र आव्हाडसारख्यांना मुस्लिमांसमोर जितके वाकता येईल, तितके वाकून मतांचे दान आपल्या झोळीत पाडायचे असते. म्हणून ते हे वास्तव स्वीकारणार नाहीत, मात्र कोंबडा आरवला नाही, म्हणून सूर्य उगवायचा थोडीच थांबत असतो, तसेच हे.

 

पवार आणि आव्हाड मुस्लिमांपुढे गोंडा घोळत असतानाच आपण तरी का त्यात मागे राहावे, असा विचार अशोक चव्हाणांनी केला आणि काँग्रेस कोणाच्या इशाऱ्यावर चालते याची कबुली त्यांनी देऊन टाकली. मागील लोकसभा निवडणुकीवेळी आणि कितीतरी राज्यांच्या प्रचारावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष स्वतःचे शिवभक्तपण आणि जानवेधारी हिंदूपण सिद्ध करण्यात व्यस्त होते. परंतु, राहुल गांधी आणि काँग्रेसचे हिंदूपण वा सौम्य हिंदुत्व वगैरे थोतांड असून हिंदूंची मते मिळवण्यासाठीचे कारस्थान असल्याचेच अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. मठा-मंदिरांच्या पायऱ्या झिजवताना काँग्रेसनेत्यांच्या मनात निराळेच काहीतरी शिजत होते, हिंदूंना भुलवून, फसवून मते मिळवायची आणि नंतर मुस्लिमांच्या सांगण्यानुसार मुंडी हलवायची, हा काँग्रेसचा डाव होता व आहेही. राज्यातही काँग्रेसने मुस्लिमांना विचारून सत्तेत सहभाग घेतला, याचाच अर्थ त्या पक्षाला इतर हिंदूंशी काहीही घेणेदेणे नाही. तथापि, सदासर्वकाळ स्वतःच्या धर्मनिरपेक्षतेचा जप करणाऱ्या काँग्रेसच्या मुखवट्यामागे मुस्लीम धर्मप्रेमाचाच चेहरा असल्याचा हा एकमेव दाखला नव्हे. कारण, सोनियांच्या हातचे बाहुले असलेल्या मनमोहन सिंग यांनी देशातील साधनसंपत्तीवरील मुस्लिमांच्या पहिल्या हक्काची भलामण करत तो दिलाच होता. हिंदू दहशतवाद, प्रस्तावित सांप्रदायिक हिंसा निवारण विधेयक, आताच्या नागरिकत्व कायद्याला केलेला विरोध, हा त्या पक्षाच्या रचनेत कोणता डीएनए आहे, त्याचे निदर्शकच. अर्थात या लोकांचे दिवस भरल्याने देशातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसलाही कधीचेच लाथाडले आहे. तरीही ते सुधारताना दिसत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्यावर जनादेशाशी विश्वासघात करून लबाडीने सत्ता मिळवण्याची वेळ येते. पण, या विश्वासघाताची शिक्षा त्यांना आज ना उद्या भोगावीच लागेल, तेव्हा आता ज्यांच्यापुढे ते कुर्निसात करतात, त्या मुस्लीम मतदारांचा काहीही उपयोग होणार नाही. कारण देशाचा आत्मा असलेला हिंदू जागृत झालेला आहे आणि तो आपल्याविरोधातल्या प्रत्येक मनसुब्याला धुळीस मिळवेल.

@@AUTHORINFO_V1@@