
मुंबई : मुंबईत अद्याप बलात्काराच्या घटना थांबत नाहीत. सोमवारी रात्री कुर्ला येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. एकीकडे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार, दरोडे, खूनसारख्या घटना घडत आहेत.महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आहे. सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना ‘नाइटलाइफ’चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे? असा बोचरा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. २७ जानेवारीपासून मुंबईमध्ये नाइटलाइफ सुरु करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावर ते बोलत होते.
मरिन ड्राईव्ह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीत नाइटलाइफ सुरु करण्याची सरकारची योजना असली, तरीही २४ बाय ७ चालणाऱ्या लाइफमुळे मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर ताण येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संख्याबळ आताच कमी आहे. पोलिसांवर आधीच नियमित कामाचा ताण-तणाव आहे. त्यात नाइटलाइफ सुरु झाल्यास पोलिसांच्या कामावर नक्कीच अधिक तणाव निर्माण होईल. आणि त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल, अशी चिंताही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी व्यक्त केली.