नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विजयी हॅट्रीकनंतर सोमवारी चौथ्यांना विधानसभा निवडणूकांचा अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री इतका गाजावाजा केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात अयशस्वी ठरले. याचे कारण त्यांना कार्यालयात पोहोचण्यासच उशीर झाला. रोड शोला उशीर झाल्याने केजरीवाल अर्ज दाखल करू शकले नाहीत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. केजरीवाल रोड शो करण्यात व्यस्त असल्याने ठरलेल्या वेळेत पोहोचू शकले नाहीत. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २०१५ सालीही अशाच प्रकारे त्यांना अर्ज दाखल करण्यास उशीर झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या रॅलीला अर्ज दाखल करण्यासाठी उशीर झाला होता. त्यावेळीही आव्हाडांनी दुसऱ्या दिवशी जाऊन उमेदवारी अर्ज भरला होता.