मुंबई : प्रथम शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून फोल ठरल्यानंतर आता १० रुपयाच्या थाळीचादेखील फुगा फुटला आहे. सर्वसामान्यांना दहा रुपयांमध्ये सकस आहार देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. मात्र, आता शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार साधारण २ कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मुंबईला फक्त ४५० थाळ्या देण्यात आल्या आहेत.
महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात दहा रुपयांच्या जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला होता. १० रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या प्रस्तावात होता.
या प्रस्तावाची शक्यता तपासून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळापुढे सादर होणार झाली. राज्य सरकारने राज्यभरात १० रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला असून १० रुपयात ही थाळी नागरिकांना मिळणार होती. मात्र, या थाळींची संख्या मर्यादीत असल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पण, २ कोटींची लोकसंख्या असलेल्या मुंबईला फक्त ४५० थाळ्या देण्यात आल्या आहेत.