योगेश सोमण यांच्यावरील कारवाईवरून
फडणवीसांचे शरसंधान
मुंबई : “महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला
ज्यांच्या वीरतेचा सार्थ अभिमान आहे, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर
यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकार्याला थेट
सक्तीच्या रजेवर पाठविणे, हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा
फासणारा आहे. त्यामुळे यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष
घालावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी,” अशी मागणी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात की, “महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर यांच्यासारख्या थोर पुरुषांची थोरवी कुणी सांगायचीच नाही का?, असा प्रश्न अशा घटनांमुळे उपस्थित होतो आहे. मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांना या अजब मानहानीला सामोरे जावे लागले आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल योगेश सोमण यांनी गौरवोद्गार काढल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित एनएसयुआय या संघटनेने आंदोलन केले आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी थेट योगेश सोमण यांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला. हा निर्णय तमाम देशभक्तांना प्रचंड वेदना देणारा आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.