नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतेच २०१९ वर्षातील खेळाडूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरचा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहली याचा आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट २०१९ हा पुरस्कार देऊन गौरव केला.
भारताच्या दीपक चहरने २०१९मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात हॅटट्रिकसह ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. तो टी-२०मधील हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय ठरला. श्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा ८ धावांत ६ विकेट घेण्याचा विक्रम त्याने मोडला होता.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती आणि आयसीसीने या कृतीला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' या पुरस्काराने गौरविले आहे.