भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांची सरकारवर टीका
मुंबई : 'सोनिया गांधी यांच्या नावाने
शपथ घेणाऱ्या मुलाबद्दल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल?'
अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मंत्र्यांच्या गाडीचे टायर
बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला. कोल्हापुरात भाजप महानगरअध्यक्ष निवड प्रक्रियेवेळी उपस्थित
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवून
बहुमत मिळवले होते, याकडे लक्ष वेधत प्रदेशाध्यक्ष पाटील
यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने
अवैध युती करुन सरकार स्थापन केल्याची टीका केली. 'एकत्रित
निवडणूक लढवताना शिवसेनेने युतीला मतदान मागितले होते. युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मते मागितली होती. पण निवडणुकीनंतर
ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली,' असे ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी शरद
पवारच निर्णय घेतात, असा दावा पाटील यांनी केला.