सोलापूर : ''आम्ही सरकारच्या कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. राज्यातील जनतेला आमचा कारभार ठाऊक असून कोणीही कितीही आरोप करावेत. आमच्या काळात कोणाचीही अडवणूक केली नाही. कोणतेही प्रकल्प अडवले नाहीत. कसलाही भ्रष्टाचार केला नाही. पारदर्शी कारभार महाराष्ट्राने पाच वर्षे पाहिला होता. कुणाला चौकशी करायची ती करा,'' असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर घोटाळ्याचे आरोप सरकारमधील काही मंत्री करत आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असे म्हटले होते. या सर्व प्रकारला देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे बोलताना प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस हे अकलूजमध्ये दिवंगत शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणासाठी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहित पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.