नवी दिल्ली : भारतीय सैन्यदल सेवेत नव्याने लष्करप्रमुख या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी येत्या काळात त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे याचा उलगडा केला. त्याचबरोबर दहशतवादाबद्दल नवीन लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला.
जनरल बिपिन रावत यांच्यानंतर उत्तराधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या मुलाखतीत नरवणे यांनी सांगितले की, "पाकिस्तान पुरस्कृत कोणत्याही दहशतवादाच्या हल्ल्याला उत्तर देण्याचे अनेक पर्याय आहेत. दहशतवाद ही जगभरातील समस्या आहे. भारत दीर्घ काळापासून दहशतवादाचा सामना करत आहे. आता संपूर्ण जग दहशतवादाने ग्रस्त बर्याच देशांना हे किती धोकादायक आहे याची जाणीव झाली आहे."
"आपल्या शेजाऱ्यांचा प्रश्न आहे, दहशतवादाचादेखील त्यांच्या धोरणांमध्ये समावेश आहे. ते दहशतवादाच्या माध्यमातून आपल्याबरोबर युद्ध करत आहे. हे सर्व फार काळ टिकू शकत नाही. पाकिस्तानने युद्धबंदी तोडली आहे आणि घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत, परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत." असेही त्यांनी सांगितले.