‘ब्रेक्झिट’ आणि ‘सीएए’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020   
Total Views |

vv2_1  H x W: 0



जागतिक स्तरावर ‘ब्रेक्झिट’ हा विषय अतिशय गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच वेळी भारतात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) यावर रणकंदन माजलेले आहे. ‘ब्रेक्झिट’ म्हणजे काय आणि त्याचा संबंध ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’शी कसा येतो, हे आपण बघूया.



‘ब्रेक्झिट’ हा शब्द ‘ब्रिटन’ आणि ‘एक्झिट’ या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे. ‘एक्झिट’चा अर्थ होतो, बाहेर पडणे. ‘ब्रिटन’ कशातून बाहेर पडणार आहे? तर ब्रिटन युरोपियन संघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडणार आहे. हा युरोपियन संघ काय भानगड आहे, हे समजल्याशिवाय ब्रिटन त्यातून का बाहेर पडणार, हे समजणार नाही.


युरोपातील छोट्या
-छोट्या राज्यांचा दहाव्या-बाराव्या शतकापासूनचा इतिहास आपापसात सतत लढत राहण्याचा आहे. आपल्याला पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध माहीत असते. या दोन्ही महायुद्धांची रणभूमी युरोप होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या देशांची आपआपसात लढण्याची हौस पूर्ण भागली होती. मग त्यांनी ठरविले की, आपापसात लढत राहण्यापेक्षा आपण आपला एक संघ तयार करूया. देशाच्या सीमा पुसून टाकूया. एक समान चलन निर्माण करूया. न्यायदान करण्यासाठी एक समान न्यायपीठ उभे करूया. प्रथम ‘युरोपियन कॉमन मार्केट’ची स्थापना झाली आणि नंतर तिचेच ‘युरोपियन युनियन’मध्ये रुपांतर झाले.


हे एक आश्चर्यच होते
. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ग्रीक असे सर्व देश इतिहास काळात एकमेकांविरुद्ध भीषण लढाया लढत होते. त्यांनी या लढाया थांबविल्या आणि समान कार्यक्रमांवर, विकासाच्या मुद्द्यांवर, नागरिकांच्या सुखांसाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. (म्हणजे ‘महाविकास आघाडी’ तयार केली.) १९७३ साली ब्रिटन या ‘युरोपियन मार्केट’मध्ये सामील झाली. १९७५ साली ब्रिटनमध्ये या प्रश्नावर सार्वमत घेण्यात आले. ब्रिटनने ‘युरोपियन युनियन’मध्ये सामील व्हायचे की नाही, या प्रश्नावर मतदारांनी मतदान केले. ६७ टक्के मतदारांनी अनुकूल मतदान केले.


हा युरोपियन संघ एक सामायिक बाजारपेठ म्हणून उदयाला आला
. त्यामुळे त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती वाढली. व्यापाराचीदेखील शक्ती वाढली. त्याचे लाभ युरोपातील समृद्ध देशांना झाले, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास देशांनाही झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपच्या भूमीत कोणतीही लढाई झाली नाही, हेदेखील एक आश्चर्यच आहे.


ज्यांना ब्रिटनचा इतिहास माहीत आहे
, लोकांची मानसिकता माहीत आहे, त्यांचा असा अंदाज होता की, ब्रिटन या संघात फार काळ राहणार नाही. २०१६ साली ब्रिटनमध्ये पुन्हा सार्वमत घेण्यात आले. या सार्वमताचा विषय होता, ‘युरोपियन युनियन’मध्ये राहायचे की बाहेर पडायचे. ५२ टक्के लोकांनी बाहेर पडण्याचा निर्णय दिला. २०१६ पासून ‘ब्रेक्झिट’ हा शब्दप्रयोग सुरू झाला. २०१६ साली ब्रिटनला ‘युरोपियन युनियन’मधून बाहेर पडले पाहिजे, असे का वाटले?


त्याचे पहिले कारण असे की
, ब्रिटिश लोकांना असे वाटू लागले की, युरोपियन संघात राहून आपण आपली अस्मिता आणि स्वतंत्र ओळख नजीकच्या भविष्यकाळात पुसून टाकू. ब्रिटनचा माणूस हा आपल्यासारखाच परंपरावादी आहे. त्याच्या परंपरा तो प्राणापलीकडे जपतो. या त्याच्या स्वतंत्र ओळखीवर युरोपातून येणार्‍या लोकांचे आक्रमण सुरू झाले. मुक्त श्रमिक बाजारपेठ तयार झाल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी युरोपीय देशांमधून लाखांनी लोक ब्रिटनमध्ये आले. ब्रिटनमधूनही दुसर्‍या देशात गेले. ब्रिटनमध्ये आलेल्या लोकांसंबंधी स्थानिक लोकांची अशी भावना झाली, ‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम हैं?’


या लोकांमुळे आपल्या रोजगारावर आक्रमण होतो
. येणारे लोक आपल्या संस्कृती, परंपरेशी जुळवून घेत नाहीत. त्यांचे वेगळेच चालू असते. त्यात सीरियातून येणार्‍या प्रचंड निवार्सितांची भर पडत चालली. आपला देश धर्मशाळा करायचा की त्याची ओळख स्वतंत्र ठेवायची, हा प्रश्न इंग्लडपुढे निर्माण झाला आणि त्यांनी स्वतंत्र ओळख ठेवण्याकडे आपला कल दिला. आपल्या देशात जसे बौद्धिक गोंधळ घालणारे लोक आहेत, तसे तेथेदेखील आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, तेथील जनता ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करण्यात तज्ज्ञ आहे. ती अशा लोकांचे बोलणे ऐकून घेते, पण त्यांना शक्ती देत नाही.


या प्रश्नावरून २०१६ पासून ब्रिटनमध्ये घमासान युद्ध चालू आहे
. पंतप्रधान टेरेसा मे यांना युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कार्यक्रम ठरविता न आल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. डिसेंबर २०१९ ला तेथे निवडणुका झाल्या आणि काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे बोरिस जॉन्सन प्रचंड बहुमताने निवडून आले. ‘युरोपियन युनियन’मधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या पार्लमेंटने प्रचंड बहुमताने संमत केला. आता ३१ जानेवारी २०२० ही तारीख ‘युरोपियन युनियन’मधून बाहेर पडण्याची ठरविण्यात आली. बाहेर पडण्याची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.


‘ब्रेक्झिट’मधला सर्वात महत्त्वाचा विषय, ब्रिटनच्या अस्मितेचा आहे. आर्थिक विषय त्याच्यामागे आहेत. ब्रिटिश माणूस हा व्यापारी माणूस आहे. व्यापारी माणूस घाट्याचा व्यापार करीत नाही. हा घाट्याचा व्यापार त्याला बंद करायचा आहे. आपली अस्मिता शाबूत ठेवायची आहे. त्यांनी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ केला नाही. पण ‘आपले नागरिकत्व’ म्हणजे ‘आपली ओळख’ जर आपल्या भूमीवर येणारे युरोपियन लोक आणि विदेशी लोक पुसून टाकणार असतील तर ते आम्ही सहन करणार नाही, हे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.


ब्रिटिश माणसाची ओळख कशात आहे
? तो प्रथम राजनिष्ठ असतो. राजा किंवा राणीवर त्याची निष्ठा असते. दुसरी गोष्ट त्याला त्याची संसद सदैव सार्वभौम असली पाहिजे असे वाटते. युरोपच्या कोर्टाचा हस्तक्षेप आपल्याकडे नको, ही त्याची भावना आहे. तिसरी गोष्ट तो प्रोटेस्टंट मूल्यांची जपवणूक करतो. चौथी गोष्ट आपल्या परंपराचा त्याला खोलवरचा अभिमान आहे. या परंपरा ज्यातून व्यक्त होतात, त्याला ‘कॉमन लॉ’ असे म्हणतात. त्याविषयी तो बांधील असतो.


आपला देश नेहरू
-गांधी काँग्रेसने धर्मशाळा करून टाकला. धर्मशाळा तत्त्वज्ञान उभे केले. ब्रह्मदेशातून रोहिंग्या आला, द्या त्याला स्थान. बांगलादेशातून मुस्लीम घुसखोर आले, बसवा त्यांना भारतात. पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येथील राजवटीला कंटाळून जे भारतात येतील त्या मुसलमानांना बसवा.


हे घुसखोर आपल्या साधन संपत्तीवर डल्ला मारतात
. आपल्या नोकर्‍या खातात, त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची, निवासाची व्यवस्था आपल्याला करावी लागते. ही फुकटची फौजदारी करण्याचे कारण नाही. त्यांचे त्यांचे स्वतंत्र देश आहेत. ते त्या-त्या देशाचे नागरिक आहेत. नागरिकाच्या आरोग्याची, जीवनाची, संपत्तीची काळजी करणे, हेच त्या-त्या देशाचे काम आहे. ही फुकटची पीडा आपल्या गळ्यात कशासाठी बांधून घ्यायची? मूर्ख लोक सांगतील की मानवतावादासाठी! मानवतावादासाठी आपण त्या-त्या देशांना मदत करू शकतो. त्या-त्या देशात दळवळणाची साधने उभी राहवीत, शाळा उभ्या राहाव्यात, उद्योग उभे राहावेत, यासाठी मदत करू शकतो. परंतु, त्या देशातील लोकांना आपल्या देशात वसविणे, हे कधीही करता नये.


ब्रिटनच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली
, तेव्हा त्यांनी तो प्रश्न जनतेच्या दरबारात नेला. जनतेलाच सांगितले की, तुम्ही याचा निर्णय करा. आपण जर ‘युरोपियन युनियन’मध्ये राहिलो तर दरवर्षी युरोपातील देशांतील लाखभर लोक आपल्या देशात येत राहतील. त्यांची काळजी करायची कोणी? जनतेने निर्णय दिला, ‘मानवतावाद गेला चुलीत, आपण आपले हित बघितले पाहिजे. आपली ओळख कायम ठेवली पाहिजे. जगाशी व्यापार आपल्या हिंमतीवर करू शकतो. नाही तरी एकेकाळी सर्व जगावर राज्य करणारे आपण आहोत. आपल्याला काहीही अशक्य नाही.’ हे न बोलता, न लिहिता, ब्रिटिश जनतेने मतपेटीच्या माध्यमातून प्रकट केले आहे.


आपल्यालाही आपल्या अस्मितेचा विचार केला पाहिजे
. आपली अस्मिता सनातन भारताची आहे. या अस्मितेवर सीमेपलीकडून इसवी सनाच्या सातव्या शतकापासून आक्रमणे झालेली आहेत. शेवटचे आक्रमण अहमद शहा अब्दालीचे होते. पानिपतची तिसरी लढाई हे त्याचे स्मारक आहे. आता त्या इतिहासाची पुन्हा उजळणी नको. आपल्याला आपल्या अस्मितेसहित अतिशय शक्तिशाली बनून उभे राहिले पाहिजे. भारताला जे आपली माता मानतात, इथल्या संस्कृतीचा आदर करतात आणि वेळप्रसंगी तिच्यासाठी बलिदानासही तयार राहतात, ते सर्व आपले. दुबईत किंवा कराचीत बसून मुंबई किंवा अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करणारे आपले शत्रू आहेत. त्यांच्या साथीदारांना या देशात स्थान नाही. इंग्लडने ‘ब्रेक्झिट’च्या माध्यमातून नको असलेल्या लोकांचा येण्याचा मार्ग बंद करण्याचे ठरविले आहे. आपण ‘सीएए’च्या माध्यमातून हेच काम करण्याचे ठरविले आहे.

@@AUTHORINFO_V1@@