पाकिस्तानला दणक्यावर दणके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |


 


पाकिस्तानने मसूद अझहरला सोडण्याची, फवाद चौधरीच्या कबुलीनाम्याच्या व्हायरल होण्याची वेळही मोठी विचित्र आहे. येत्या महिन्याभरात 'फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स'ची (एपीजी विभाग) बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तसे झाले तर आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला बसलेला तो मोठा दणका असेल.


परकीय गुंतवणूकदारांनी आपल्या देशांत पैसा ओतावा म्हणून कुराणात 'हराम' मानला गेलेला स्त्रियांना नाचवण्याचा उद्योग नुकताच पाकिस्तानने केला. अर्थात, जगभर वाडगा घेऊन फिरणाऱ्या इमरान खान यांना कोणी दारातही उभे न केल्याने दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पाकिस्तानकडे दुसरा पर्यायही उरला नसेलच म्हणा! दुसरीकडे पाकिस्तानचे अर्थशास्त्री गुंतवणुकीसाठी नाचाचे कार्यक्रम घेत असतानाच, त्या देशाने कुख्यात दहशतवादी व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला मुक्त केले. भारताने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द करून त्या राज्याचे विभाजन केल्याने पाकिस्तान कमालीचा बिथरल्याचे आपल्याला माहितीच आहे. परंतु, यत्र-तत्र-सर्वत्र भारताविरोधात शड्डू ठोकण्याच्या उठाठेवी करूनही पाकिस्तानची बेटकुळी काही फुगलीच नाही. परिणामी, सर्वस्व गेल्यानंतर बेभान झाल्याप्रमाणे पाकिस्तान वागू लागला व आताचा त्याचा मसूदला सोडण्याचा निर्णयही त्याच मालिकेतला एक भाग. भारताबरोबर समोरासमोरच्या युद्धात पळता भुई थोडी होईल, याची जाणीव असलेल्या पाकिस्तानने मसूदला कोणत्या कामासाठी मुक्त केले असावे, याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. आतापर्यंत ज्या दहशतवादाच्या जोरावर पाकिस्तानने काश्मीरसह भारताच्या निरनिराळ्या भागांत बॉम्बस्फोटांच्या माध्यमातून अराजक पसरविण्याचा खेळ केला, तसाच डाव त्याचा आताही आहे.

 

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार सियालकोट-जम्मू-राजस्थान असा हल्ला करण्याची पाकिस्तानची योजना असून त्यासाठीच मसूदला मोकळे करण्यात आले. इमरान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 'कोणत्याही थरापर्यंत जाऊ'च्या दिलेल्या धमकीचा अर्थ हा होता, असेही यातून स्पष्ट होते. तसेच मसूद अझहरची अटक पाकिस्तानने मनात नसतानाही केवळ जागतिक दबावातून केल्याचेही समजते. आता तर मसूदने आपल्या अंड्यापिल्लांना भारतात हल्ला करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्याचेही समोर आले. परंतु, असे करून पाकिस्तान साध्य काय करणार? कारण, पुलवामा हल्ल्यानंतर 'एअर स्ट्राईक' करत भारताने पाकिस्तानला त्याची औकात दाखवून दिली होती. मात्र, मसूद अझहरच्या हातून पाकिस्तानने भारतात पुन्हा काही हालचाल केली, तर तो देश बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. पाकिस्तानला नवसाचं पोर मानणाऱ्या चीनला वगळल्यास सध्या संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कलम ३७०, जम्मू-काश्मीरच्या विभाजनावरून बलाढ्य देशांचे प्रमुखही भारताला पाठिंबा देताना दिसतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानने काही आगळीक केलीच, तर ती त्याच्या सर्वनाशालाही कारणीभूत ठरू शकते. कारण, भारत आणि विद्यमान भारतीय नेतृत्व आपल्या एकता-अखंडतेसाठी कोणत्याही थराला जाण्याची जिगर व धाडस बाळगते; तेही समोरासमोर उभे राहून, लढून. पाकिस्तानी लांडग्यांप्रमाणे पाठीमागून वार करून नव्हे, हे पाकिस्तानने नेहमीसाठी लक्षात ठेवावे. मसूद अझहरच्या सुटकेनंतर पाकिस्तानी मानसिकता कशाकशाचा अभिमान बाळगते, हेही उघड झाले. पाकिस्तानचे विद्यमान विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी भारताच्या 'चांद्रयान-२' बद्दल दोन-तीन दिवसांपूर्वीच अवमानकारक ट्विट केले.

 

पाकिस्तानची अवकाश मोहीम चीनच्या टेकूवर चालते, हे तर जगजाहीरच. अशा देशाच्या नेत्याला, मंत्र्याला इतरांपुढे हात पसरण्याची खरेतर लाज वाटायला हवी. पण, ते राहिले बाजूला आणि फवाद चौधरी भारतावरच टाळ्या पिटत टीका करायला लागले. अर्थात, इतरांच्या वाईट होण्यात आनंद शोधणाऱ्या प्रवृत्तीचे पुढारलेपण पाकिस्तानकडे असल्याने असे होणे साहजिकच. तद्नंतर मात्र नेटकऱ्यांनी फवाद चौधरी यांना त्यांची व त्यांच्या देशाची लायकी काय तयार करण्याची आहे हे दाखवून दिले, तेही त्यांच्याच शब्दांत. फवाद चौधरी यांनी ६ नोव्हेंबर, २०१३ ला केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट आत्मघाती बॉम्ब तयार करतो.” फवाद चौधरी यांनी दिलेली ही कबुली वास्तवात कधीचीच उतरल्याचे दिसते. कारण, पाकिस्तानने आपल्या जन्मापासून केवळ आत्मघाती बॉम्ब किंवा फिदायीन हल्लेखोर तयार करण्याचेच काम केले. आता ते सर्वोत्तम आहेत की, तालिबान अन् इसिसवाले सर्वोत्कृष्ट आहेत, यात मात्र स्पर्धा होऊ शकते. सोबतच धर्माच्या शाली खांद्यावर घेऊन जिहादशिवाय आपण अन्य काही करूही शकत नाही, हेही फवाद चौधरी यांनी यातून सांगितले. उल्लेखनीय म्हणजे पाकिस्तानने मसूद अझहरला सोडण्याची, फवाद चौधरीच्या कबुलीनाम्याच्या व्हायरल होण्याची वेळही मोठी विचित्र आहे. येत्या महिन्याभरात 'फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स'ची (एपीजी विभाग) बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तसे झाले तर आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला बसलेला तो मोठा दणका असेल. तत्पूर्वी आपल्या कुटील कारवायांमुळे पाकिस्तानचा ग्रे लिस्टमध्ये आणि नंतर अंतरिम काळ्या यादीत समावेश करण्यात आलाच होता. पण, पाकिस्तानची बळी जाण्याची लालसाच एवढी प्रचंड की, तो आता दहशतवादाच्याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा दिवाळखोरीसाठी तयार झाला व त्याने मसूद अझहरला सोडले!

 

हे सगळे घडत असतानाच पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलाच झटका दिला. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्याची आणि तिथल्या नव्या सत्तास्थापनेसाठी तालिबानशी बोलणी करण्याचे आधी म्हटले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यास तिथे तालिबानच्या माध्यमातून उपद्रव माजवण्याची पाकिस्तानची इच्छा होती. सोबतच तालिबानी दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरसाठी जिहादची प्रेरणा देण्याचे मनसुबेही पाकिस्तानने रचले होते. पण, तालिबानने अमेरिकेशी बोलणी करण्याआधीच आपले जुनेच रंग दाखवायला सुरुवात केली. तालिबानने केलेल्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक ठार झाले व नंतर चिडलेल्या अमेरिकेने तालिबानशी बोलणी रद्द करत असल्याचे जाहीर केले. तालिबानशी चर्चेच्या बाजूने नसलेल्या भारतासाठी ही दिलासादायक घटना होती, तर पाकिस्तानच्या मनातले मांडे मनात करपवणारी! तत्पूर्वी तालिबानचा भस्मासुर पाकिस्तानी भूमीवरच पैदा झाला, वाढला आणि पसरला. अफगाणिस्तानमध्ये त्याने धुमाकूळ घातला व तिथली संस्कृती-वारसा नष्ट करण्याचे कामही तालिबानने केले. पाकिस्ताननेही तालिबानच्या नावावर अमेरिकेकडून पैसा उकळला, स्वतःला दहशतवादाने पीडित असल्याचे भासवले. असे असूनही ट्रम्प यांनी आपल्या मतदारांना दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी तालिबानच्याच घशात अफगाणिस्तान टाकून तिथून हलण्याची भूमिका घेतली. परंतु, त्यावेळी त्यांनी भारताने अफगाणिस्तानमध्ये लष्करीदृष्ट्या सक्रिय व्हावे, अशीही एक अपेक्षा व्यक्त केली होती. आता मात्र, अमेरिका तिथून बाहेर पडणार नाही, हे जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हात हातात घेण्याचे जे काम अमेरिकेने चालू केले होते, त्यालाही खीळ बसेल. अशा परिस्थितीत भारताने संधीचा फायदा घेत अफगाणिस्तानसारख्या मोक्याच्या प्रदेशाचा वापर करून घ्यायला हवा. अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधा, धरणप्रकल्पांसाठी भारताने आधी मदत केलेलीच आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंधही उत्तम आहेत. सोबतच अमेरिकेला चीनवर दबाव आणण्यासाठी भारताची गरज आहे. त्यासाठी अफगाणिस्तानचा उपयोग करून घेता येईल का, याचा विचार केला पाहिजे. तसे झाले तर भारताला पाकिस्तानलाही वेसण घालता येईल आणि अमेरिकेची साथही मिळेल. अर्थात, या सगळ्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होईलच आणि तसे व्हायलाच हवे. कारण, पाकिस्तानसारख्या नापाक देशाची जिरलेली पाहण्यात एक निराळाच 'स्वॅग' आहे!

@@AUTHORINFO_V1@@