रामनाथ कोविंद यांना हवाई प्रवेश नाकारण्याचे दुस्साहस
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तानचा उद्दामपणा महिन्याभरानंतरही कायम असल्याचे चित्र आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवेश नाकारण्याचे दुस्साहस शनिवारी पाकिस्तानने केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ९ सप्टेंबरपासून आइसलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौर्यावर जाणार आहेत. मात्र, पाकिस्तानने कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास शनिवारी ठाम नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून आइसलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौर्यावर जाणार आहेत. कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी परवानगी भारताने मागितली होती. पण पाकिस्तानचा यास पूर्णपणे नकार असल्याचे, कुरेशी यांनी सांगितले. या निर्णयाशी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हेदेखील सहमत असून काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या वायुदलाने बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी पूर्णपणे बंद केली होती. मार्चमध्ये त्यांनी अंशतः हवाई हद्द खुली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
‘पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावू’