साहित्य क्षेत्रावर शोककळा
मुंबई : प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर (७७) यांचे गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’ आदी क्लासिक कादंबऱ्यांसह नगरकर यांनी मराठीसह इंग्रजीतही त्यांनी लिखाण केले होते. २०१९ मध्ये त्यांची 'द आर्सेनिस्ट' कादंबरी चर्चिली गेली होती.
'हिंदू लिटररी प्राइज', 'जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट' आणि साहित्य अकादमी पुरस्कारांनी नगरकर यांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यात आला होता. किरण नगरकरांची बहुतांश साहित्यनिर्मिती इंग्रजीतलीच. इंग्रजीची व्याप्ती आणि सर्वदूर पसारा पाहता त्यांनी याच भाषेला जास्त पसंती दिली होती. ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड, गॉड्स लिटिल सोल्जर’, ‘द एक्स्ट्रॉज’ या नगरकरांच्या एकाहून एक सरस इंग्रजी कादंबऱ्यांनी वाचकांचे कल्पना व अनुभवविश्व आणखी समृद्ध केले आहे.
‘कबीराचे काय करायचे?’ व ‘बेडटाइम स्टोरी’ या दोन नाट्यकृती किरण नगरकरांच्या कल्पनेतून साकारल्या. ‘स्प्लिट वाइड ओपन’ या चित्रपटातून त्यांचा अभनियही पाहायला मिळाला. नगरकर यांनी लिहिलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शब्द पब्लिकेशनने ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची क्लासिक आवृत्ती प्रसिद्ध केली.
डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनाने ‘कोसला’ची सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रसिद्ध केली होती. ‘कोसला’प्रमाणेच दर्जेदार असलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीचा प्रत्यक्ष खप पहिल्या आवृत्तीच्या वेळी कमी झाला असला तरी किरण नगरकरांच्या लेखनकृतीचे जाणकारांनी तोंडभरून कौतुक केले होते.
‘रावण अँड एडी’ ही त्यांची कादंबरीही मराठीत अनुवादीत करण्यात आली. माणसाचे जगणे हा केंद्रबिंदू व त्या जगण्यातील असहायता, नश्वरता याचे दर्शन घडवणे हा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या कथानकाचा गाभा. जीवनातील प्रत्येक रूप, अरूप, विरूपाचा शोध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’च्या क्लासिक आवृत्तीला किरण नगरकर यांनी लिहिलेल्या विशेष मनोगतातून त्यांनी या कादंबरीबद्दल तसेच स्वत:च्या साहित्यप्रवासाबद्दलही थोडेसे विस्ताराने सांगितले आहे. नगरकर यांच्या जाण्याने कला, साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले आहे.