मुंबई :
एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या चुकीच्या बातमीमुळे
गडकिल्ल्यांसंदर्भात चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने केले आहे. राज्यात दोन
प्रकारचे किल्ले आहेत. 'वर्ग
एक' आणि 'वर्ग दोन'. महाराष्ट्राचे
आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा वर्ग एकमध्ये समावेश होतो. तर,
वर्ग
दोनमध्ये अन्य किल्ले येतात. वर्ग दोनमधील किल्ल्यांची संख्या सुमारे ३०० इतकी
आहे.
वर्ग एकमधील किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व विभागातर्फे या गडकिल्ल्यांच्या संरक्षणाचे काम पाहिले जाते. अशा वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केल्या जातात. या किल्ल्यांच्या विकासासाठी अन्य स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित अन्य कुठलीही पुरातन वास्तू जतन करून तिचे पावित्र्य जपले जाणार असल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.
वर्ग दोनमध्ये येणारे किल्ले असंरक्षित वर्गात येतात, अशा किल्ल्यांचा राज्याच्या पर्यटन विभागाने ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नसमारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, असे मत राज्याच्या पर्यटन सचिव विनीता सिंघल यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या वृत्तपत्रात अशा प्रकारची बातमी आली तर त्यामुळे चुकीचे अर्थ काढता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.