अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |


हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकचा देवाचा अवतार साकारणाऱ्या, चेहऱ्याला रंग फासलेल्या दशावतारी वेशातील पोस्टर सध्या खूप व्हायरल होत आहे. 'प्लॅटून वन फिल्म्स' या संस्थेची निर्मिती असलेल्या 'पिकासो' या मराठी चित्रपटाचा हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील ही मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.

अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांनी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले असून 'कोर्ट', ‘मसानया बहुचर्चित लोकप्रिय चित्रपटांच्या वितरण, मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचे असून हा त्यांचा हा पहिलाच चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' '७ व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे.

२८ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता, सिनेपॉलिस, फन रिपब्लिक, अंधेरी, मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष प्रयोग होणार आहेत.

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी - नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध असून या लोककलेवर बेतलेला 'पिकासो' हा एकमेव चित्रपट आहे. योगायोग म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून राजाश्रय व सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब दशावतारी कलावंतांनी जोपासले असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

तीन लाख पन्नास हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारने या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. "आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत" असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सांगतात.

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या किल्ला चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे पिकासोसाठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून त्यांचे पिकासोच्या निर्मितीत विशेष योगदान आहे. या विषयी सांगताना ते म्हणतात "ही कला नेहमीच माझा उत्साह वाढवीत आली आहे. या चित्रपटात दशावतारी कलावंतांच्या दैनंदिन जीवनमान, त्यांचा अंतर्गत संघर्ष इत्यादी बाबींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून स्वतःमधील सत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे."

@@AUTHORINFO_V1@@